Congress on Ujwal Nikam: उज्वल निकमांच्या नियुक्तीवर काँग्रेस आक्रमक; नाना पटोलेंची सरकारकडे मागणी, म्हणाले…

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने न्याय व्यवस्थेत आपली माणसे घुसवून पाप केले आहे. ऍड. उज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करुन भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकील पदाच्या नियुक्तीस काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून सरकारने याचा फेरविचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुंबईतील टिळक भवनात आयोजित पत्रकार परिषदेत पटोलेंनी सदर मागणी केली.

राज्यात बोगस बियाणे व खतांचा सुळसुळाट

राज्यात आजही दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे, खरीप हंमाग सुरु झाला आहे पण राज्यात बि, बियाणे, खते व औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नाही. जी खते बियाणे बाजारात आहेत ती बोगस आहेत. बोगस बियाणे विकून व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. ही बोगस खते, बियाणे व औषधे गुजरात व आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात येत आहेत. राज्य सरकारने या बोगस बियाणे व खत विक्रेते आणि कंपन्यांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांची फसवणूक व लूट थांबवावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी यावेळी केली.
पावसाळ्याचे दिवस, मैदानात चिखल असतो, शारिरीक परिक्षांवर फेरविचार करा, काँग्रेसची मागणी

कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याप्रकरणी पटोलेंवर टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला येथील कार्यक्रमादरम्यान एका कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्याचा मुददा आता चांगलाच तापला आहे. विरोधकांकडून नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. भाजपासह इतर सत्ताधारी पक्षाकडून नाना पटोले यांना लक्ष्य करण्यात आले आहे. दरम्यान, मला जाणीवपूर्वक बदनाम करण्यात येत असल्याचे स्पष्ट करताना नाना पटोले यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. याबद्दल पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, ज्या लोकांचे पाय ईडी कारवायांमध्ये माखले आहेत, ते रात्रीच्या अंधारात ज्यांचे पाय धुतात, चेपून देतात. त्यांच्याबद्दल देखील काही बोलले पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.