Central Railway: सदोष खांब हटवणार; वादळी परिस्थितीत घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय

मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वेगाड्यांच्या मार्गावरील सदोष स्थितीत असलेले १२ खांब हटवून त्याजागी नवे खांब उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ठाणे-मुलुंडदरम्यान ९६ किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे ओव्हरहेड वायरला (ओएचई) आधार देणारा खांब झुकला होता. आगामी पावसाळ्यात याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे १३ मे रोजी ओव्हरहेड वायरला आधार देणारा खांब झुकला. यामुळे सायंकाळी गर्दीच्या वेळेत धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक खोळंबली होती. याचा फटका लाखो प्रवाशांना बसला होता. यामुळे आगामी पावसाळा लक्षात घेता मध्य रेल्वेने खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ओएचईला आधार देणाऱ्या खांबाचे ट्रॅक कॅन्टिलिव्हर बूम बदलण्यात येणार आहे. लोकलवरील विद्युत तारांचा सर्व भार खांबावर असतो. खांब बदलण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित केला जातो. त्यानंतर रुळांलगत खड्डा खणणे, त्यात काँक्रिट टाकून खांबाचे मजबुतीकरण करणे अशी कामे करण्यात येणार आहेत. एक खांब बदलण्यासाठी साधारणे ७ ते ८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. जूनअखेर सर्व खांब बदलण्याचे नियोजन आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठाणे-मुलुंडदरम्यान झुकलेल्या खांब प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या अहवालात खांबाला वेल्डिंग करून जोडण्यात आलेला भागाला गंज लागल्याचे दिसून आले. यामुळे वादळी वाऱ्यात तो तग धरू शकला नाही, असे अहवालात स्पष्ट केले आहे. २०१०-२०११ या वर्षातील खांबांची तपासणी केली असता वेल्डिंगमध्ये तडे गेले असून काही भाग गंजलेले असल्याचे दिसून आले आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणतीही बाब आढळून आली नाही. यामुळे सदोष १२ खांब बदलण्याचा निर्णय घेण्यात आले आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

प्रवाशांचा प्रवास अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून उचलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. मध्य रेल्वे ओएचईचे सर्व खांब लवकरात लवकर बदलण्याच्या प्रक्रियेत आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले.

पावसाळापूर्व कामे गतीने

मुंबईत यंदा जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे मध्य रेल्वेने पावसाळा पूर्व कामे वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात नालेसफाईसह ओएचई खांबांची तपासणी आणि अन्य बाबींवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना रेल्वेने संबंधित सर्व विभागांना दिल्या आहेत.