पुण्यातून तुर्कीवर स्ट्राइक झाल्यानंतर आता पाकिस्तानातून धमकीImage Credit source: Tv9
पुण्यातील व्यापाऱ्याला पाकिस्तानमधून धमकीचे फोन आले आहेत. तुर्की सफरचंद बॉयकॉट केल्याने व्यापाऱ्याला पाकिस्तानमधून धमकीचे फोन आले आहेत. तुर्की वस्तूंची विक्री बंद केल्यानं इतर व्यापारांनाही धमकी आल्याचं कळतंय. भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू असतानाच तुर्कस्तानने पाकिस्तानला चिथावणी मिळेल अशी कृती केली होती. भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असताना तुर्की सैन्याच्या काही हालचालींनी भारताचं लक्ष वेधून घेतलं होतं. तुर्कस्तानी लष्कराची ‘सी-130 ई’ ही लष्करी मालवाहू विमानं कराची विमानतळावर उतरल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर देशभरातून ‘बॉयकॉट तुर्की’चा सूर उमटला. अनेकजण तुर्कीचे वस्तू बॉयकॉट करत असून सर्वांत आधी पुण्यातील व्यापाऱ्यांनी तिथले सफरचंद विकण्यावर बहिष्कार टाकला. यानंतरच त्यांना पाकिस्तानमधून धमकीचे फोन आल्याचं कळतंय.
याविषयी पुण्यातील व्यापारी सुयोग झेंडे म्हणाले, “मी कामाच्या गडबडीत असल्याने ते फोन उचलू शकलो नाही. पण नंतर त्यांनी व्हॉइस मेसेज पाठवला. तुम्ही पाकिस्तानचं, तुर्कीचं काहीच वाकडं करू शकत नाही. आमच्या मागे खूप मोठी यंत्रणा आहे, अशी धमकी त्यांनी दिली. मग मी पण त्यांना फोनवर सुनावलं.” पाकड्यांच्या या पोकळ धमक्यांचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंद रस्त्यावर फोडून टाकले आहेत आणि पाकिस्तान-तुर्कस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आहेत.
पाकिस्तानमधून धमकी आल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे का, असा प्रश्न विचारला असता झेंडे पुढे म्हणाले, “अजिबात नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे मावळे आहोत. आम्हाला कसली भीती नाही. शिवाय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, अजित डोवाल हे सर्वजण आहेतच. पुण्यातील पोलीसही आमच्या सुरक्षेसाठी तत्पर आहेत.” एकीकडे तुर्कीतील फळं, वस्तूंवर बहिष्कार टाकला जात असताना आता दुसरीकडे तुर्कीच्या टूरिझमलाही बॉयकॉट करण्याची मागणी सेलिब्रिटी करत आहेत.
शहरातील फळ बाजारात तुर्की सफरचंदांची हंगामी उलाढाल साधारपणे 1000 ते 1200 कोटी रुपये इतकी असते. त्यामुळे बहिष्काराचा हा निर्णय केवळ आर्थिक नाही तर सशस्त्र दल आणि सरकारशी एकनिष्ठ असल्याचा दर्शविणारा आहे, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. “आम्ही तुर्कीमधून सफरचंद खरेदी करणं थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी हिमाचल, उत्तराखंड, इराण आणि इतर प्रदेशांमधून सफरचंद खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आमच्या देशभक्तीच्या कर्तव्याशी आणि राष्ट्राला पाठिंबा देण्याशी सुसंगत आहे”, असं पुण्यातील एपीएमसी मार्केटमधील व्यापारी सुयोग झेंडे म्हणाले.