जागावाटपाचं सूत्र ठरवणारे कुटुंबासह दिल्लीचे उंबरे झिजवतायत, ठाकरेंवर भाजपची टीका
मुंबई : स्वाभिमान गमावणे याचा सोपा अर्थ बघायचा असेल, तर लोकांनी आजच्या उद्धव ठाकरे आणि शिवसेना उबाठाकडे बघावं, ठाकरेंची शिवसेना जेमतेम १०० जागा मिळवण्यासाठी कुटुंबासह दिल्लीचे उंबरे झिजवत आहे, अशा शब्दात महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सडकून टीका केली आहे. दिल्लीत जाऊन दोन चार जागांसाठी काँग्रेस नेत्यांच्या घरचे हेलपाटे घालत असल्याचंही उपाध्ये म्हणाले.

२५ वर्ष भारतीय जनता पक्षासोबत वैचारिक तत्वांवर आधारलेली युती, जी प्रत्यक्ष स्व. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांसारख्या महाराष्ट्राच्या धुरिणांनी काँग्रेसला सत्तेबाहेर करण्यासाठी अस्तित्वात आणली होती. भाजप सोबत लढताना १२५ पेक्षा जास्त जागांवर लढणारी शिवसेना, म्हणजे आताची उबाठा कशाबशा १०० जागा मिळवण्यासाठी कुटुंबासह दिल्लीचे उंबरे झिजवत आहे, अशी टीका केशव उपाध्येंनी केली आहे.
दिल्लीपुढे आम्ही झुकत नाही, आमचा स्वाभिमान झुलवत नाही, आम्ही कोणाला विचारायला जात नाही म्हणून डरकाळ्या फोडणारे ठाकरे आज दिल्लीत जाऊन दोन चार जागांसाठी काँग्रेस नेत्यांच्या घरचे हेलपाटे घालत असल्याचा निशाणाही उपाध्येंनी साधला आहे.                         ज्या अमित शहांची तुलना उद्धव ठाकरेंनी अब्दालीशी केली, तेच अमित शहा भाजपचे अध्यक्ष असतानाही मातोश्रीवर चर्चेसाठी आले आणि योग्य तो सन्मान दिला. पण वैचारिक भिकेचे डोहाळे लागलेल्या उद्धव ठाकरेंना ते पटले नाही. ज्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी भाजपसोबतची युती तोडली, ती सत्ता तर गेलीच, पक्षही गेला. चुकून आणि दुर्दैवाने मिळालेलं मुख्यमंत्रीपदही गेलं, असा टोलाही केशव उपाध्येंनी हाणला आहे.

आता ज्यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्रीपद स्वीकारले असे उद्धव ठाकरे सांगत होते, ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच महविकास आघाडी आज तुमचे नावही मुख्यमंत्रिपदासाठी घेत नाहीये. एकेकाळी ज्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या निवडणुका लढवल्या जायच्या, जे जागावाटप करण्याचे सूत्र ठरवायचे, तेच आज जागांचा जोगवा मागत फिरत आहेत, अशी टीकाही ठाकरेंवर करण्यात आली आहे.