Bhushi Dam: अन्सारी कुटुंबाची एक चूक पाच जणांच्या जीवावर बेतली, त्या दिवशी नेमकं काय घडलं?

लोणावळा, पुणे: लोणावळा येथील भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास धक्कादायक घटना घडली होती. पुण्याच्या हडपसर भागामध्ये राहत असलेले अन्सारी कुटुंबीय लग्न समारंभावरून येत असताना लोणावळा परिसरामध्ये असणाऱ्या भुशी डॅम परिसरामध्ये वर्षाविहारासाठी उतरले होते. मात्र, ते ज्या ठिकाणी उतरले होते, त्या ठिकाणी शक्यतो कोणी वर्षाविहारासाठी जात नाही. हे कुटुंबीय त्या ठिकाणी गेले आणि पाच जणांचा मृत्यू झाला.

हे कुटुंब ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी तीन धबधबे आहेत. या धबधब्यांचा प्रवाह एकमेकांना मिळालेला आहे. पुढे हे पाणी डॅममध्ये जाऊन मिळते. मात्र, जागा नवीन असल्याने वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
Bhushi Dam: कुटुंबासह वाहून गेली, अर्ध्यात सापडलेल्या चिमुकलीच्या हृदयाचे ठोके बंद, दोन डॉक्टरांकडून जीवनदान

भुशी डॅममध्ये तीन धबधब्यांचं पाणी

भुशी डॅममध्ये बॅक वॉटरला असलेल्या तीन धबधब्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी मिळते. या धबधब्याच्या प्रवाहामध्ये अनेक ठिकाणी मोठे उतार आहेत. त्यामुळे या ठिकाणी वर्षाविहारासाठी जाण्यास अनेकजण टाळतात. अन्सारी कुटुंब या ठिकाणी वर्षाविहारासाठी गेले होते. त्यांना त्या परिसराची माहिती देखील नसल्याची माहिती समोर आली आहे.

दहा मिनिटांत प्रचंड पाऊस अन् मोठा प्रवाह

ते ज्यावेळी पाण्यामध्ये उभे होते. अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या कालावधीमध्ये धबधबे असलेल्या परिसरात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड प्रमाणात वाढला. त्यामुळे त्या तीन धबधब्यांतून पाणी अति वेगाने खालच्या दिशेने वाहू लागले. जेव्हा पाण्याचा प्रवाह वाढू लागला तेव्हा कुटुंबाला याची जाणीव झाली, पण तोपर्यंत उशीर झालेला होता.

पाण्यात अडकलेल्या दहा जणांना बाहेर असलेल्या व्यक्तींनी वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, अखेरपर्यंत त्यात यश मिळाले नाही. अखेर हे १० जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यातील पाच जण वाचले असून पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. चौघांचे मृतदेह सापडले असून एकाचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.

त्यामुळे वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांनी फक्त काही क्षणांच्या आनंदासाठी कुठलाही धोका पत्करुन पाण्यात उतरू नये. यामुळे आपल्याला आपला आणि आपल्या प्रियजनांचा जीव गमावावा लागू शकतो, हेच नुकत्याच घडलेल्या घटनेतून समोर आले आहे. तसेच, वर्षाविहारासाठी जाताना संपूर्ण खबरदारी घ्या, जेणेकरुन असे अपघात टळू शकतील, असं आवाहन आम्ही करतो.