शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपोषणाला सुरुवात केली होती, बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस होता, अखेर सातव्या दिवशी त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. त्यापूर्वी शुक्रवारी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली होती. त्यांनी बच्चू कडू यांच्या समोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला.
यावेळी बोलताना फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात समिती नेमली जाईल, या समितीमध्ये बच्चू कडू हे देखील असतील, या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यानंतरही बच्चू कडू आपल्या उपोषणावर ठाम होते? समिती कधी स्थापन करणार हे जाहीर करावं, अशी त्यांची मागणी होती. त्यानंतर आज मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली. उदय सामंत हे पत्र घेऊन आले होते.
कर्जमाफीसंदर्भात येत्या 15 दिवसांच्या आता उच्चस्तरिय समिती नेमली जाईल, त्याचा अहवाल आला की कर्जमाफी होईल. बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्या कशा मान्य केल्या जातील याचं पत्र घेऊन मी आलो आहे. मी यासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. कर्जमाफीसाठी येत्या 15 दिवसांच्या आत उच्चस्तरिय समिती नेमली जाईल, असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं.
दरम्यान यानंतर बच्चू कडू यांनी अखेर सातव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मात्र उपोषण मागे घेतानाच त्यांनी आता कर्जमाफी संदर्भात सरकारला नवी डेडलाईन दिली आहे. येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख सांगावी अन्यथा मंत्रालयात घुसू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीवर मौन धरलं होतं, पण आता ते कर्जमाफीवर बोलायला लागले आहेत. आपण कर्जमाफीच्या मागणीवर 90 टक्के यश मिळवलं आहे. दिव्यांगांच्या देखील 20 मागण्या आपण मान्य केल्या आहेत, असं यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.