मोठी बातमी समोर येत आहे, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून अपात्र करण्यात आलं आहे, यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मला अपात्र केलं त्याची साधी नोटीस देखील दिली नाही, संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न भाजपकडून वारंवार सुरू असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
मला अपात्र केलं त्याची साधी नोटीस देखील दिली नाही, संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न भाजपकडून वारंवार सुरू आहे. अधिकाऱ्यांना देखील विचारलं पाहिजे, ज्याला अपात्र केलं त्यांना नोटीस दिली का? अमरावतीत काँग्रेस प्रणित भाजप आहे. भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून या प्रकरणात मला गोवल्या जातं आहे.
अन्नत्याग आंदोलन मागे घेतल्यानंतर लगेचच अशापद्धतीने कारवाई होते, हे बरोबर नाही. कशा पद्धतीने दबाव तंत्राचा वापर केला जाऊ शकतो, याचं हे उत्तम उदाहारण आहे. या अपात्रतेच्या निर्णयावर आम्ही न्यायालयात जाऊ, न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, विभागीय निबंधक हा एका मंत्र्याचा नातेवाईक आहे. यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहे. अशा पद्धतीने कारवाई होणार हे अपेक्षितच होतं, पण आता आमचं आंदोलन थांबणार नाही, अपात्र केल्याची अद्याप नोटीस नाही, नोटीस आल्यानंतर आम्ही न्यायालयात जाऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शेतकरी कर्जमाफी आणि आपल्या इतर काही मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. सातव्या दिवसी त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. उपोषणाचा सहाव्या दिवशी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली होती. बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवांद साधला. कर्जमाफीसाठी समिती गठीत करण्यात येईल, तिचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेऊ असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं होतं. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी देखील बच्चू कडू यांची भेट घेतली, अखेर सातव्या दिवशी बच्चू कडू यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.