Ashish Shelar On Shankaracharya : शं‍कराचार्यांवर बोलण्याची माझी लायकी नाही,आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

मुंबई : ज्योतिष पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आज ( 15 जुलै) उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी उद्धव ठाकरेंचा भाजपने विश्वासघात केला आरोप भाजपवर केला आहे. आता यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शं‍कराचार्यांवर बोलण्याची माझी लायकी नाही

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शं‍कराचार्य यांनी केलेल्या आरोपावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ” मी त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणार नाही. माझी तेवढी लायकी नाही. पण मुंबई आणि राज्यात उद्धव ठाकरे यांच्याबाबत स्पष्टता आहे की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे. काही ठराविक मतांसाठी त्यांनी बाळसाहेबांचे विचार आणि हिंदुत्व सोडले आहे”.

शंकराचार्य काय म्हणाले ?

शंकराचार्य म्हणाले की, ” आपण सगळे हिंदू आणि सनातनी धर्माचे पालन करणारे लोकं आहोत. पाप पुण्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे दिली जातात. त्याचबरोबर विश्वासघात हा सर्वात मोठा घात आहे. आणि तो उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेला आहे. यांची पीडा अनेकांना आहे. त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं. त्यांचं निमंत्रण स्वीकारून मी आज मातोश्रीवर आलो. त्यांनी माझं स्वागत केलं. मी त्यांना सांगितलं तुम्ही जो पर्यंत पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तो पर्यंत लोकांच्या मनातील दु:ख कमी होणार नाही. कोणाचे हिंदूत्व खरं हे समजून घ्यावे लागेल. जो विश्वासघात करतो तो कधीच हिंदुत्ववादी नसतो. जो विश्वासघात पचवतो तोच खरा हिंदू असतो. मात्र, यामध्ये जनतेचा देखील अपमान करण्यात आलेला आहे. जनमताचा अनादर करणे चुकीचे आहे”.
ज्यांनी उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात केला ते हिंदू कसे? भेटीनंतर शंकराचार्यांचे शिंदे-भाजपवर शरसंधान

राम मंदिराच्या सोहळ्यावर टाकला होता बहिष्कार

22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. मात्र ही प्राणप्रतिष्ठा शास्त्रानुसार होत नसल्याचा दावा करत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यासह अन्य काही शंकराचार्यांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे जोरदार समर्थन केले होतं.

दरम्यान, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे भाजपची मोठी कोंडी झाली असल्याचं बोललं जात आहे.