Ashadi Wari 2025: राज्यातील सर्व वारेकऱ्यांना आषाढी वारीचे वेध लागले आहेत. शेगाव येथून संत गजानन महाराज यांची पालखी निघाली आहे. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी 19 जून रोजी निघणार आहे. परंतु यंदा दरवर्षी चार वाजता सुरु होणारा पालखी सोहळा रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. पालखी सोहळा चार तास उशिराने सुरु होणार असल्याचे कारण विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे आणि रोहिणी पवार यांनी दिले आहे.
का होणार सोहळ्यास उशीर
विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे आणि रोहिणी पवार यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची वेळ यावर्षी पुढे ढकलण्यात आली आहे. कारण यंदा पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशीच गुरुवार आला आहे. रोजच्या नीतिनियमानुसार दर गुरुवारी माऊलींची पालखी निघते. त्याला गुरुवार सोहळा म्हणतात. म्हणजेच 19 जून गुरुवारी नितीनियमानुसारची गुरुवार सोहळ्याची पालखी निघणार आहे. त्यानंतर आरती होणार आणि मग पंढरपूर पालखी प्रस्थान सोहळा सुरू होणार आहे. यामुळे दरवर्षी दुपारी 4 वाजता सुरू होणारा प्रस्थान सोहळा रात्री 8 पर्यंत सुरू होणार आहे.
आषाढी वारीमुळे पालखी सोहळ्याबाबत साधकबाधक चर्चा झाली. वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून गुरुवारीची पालखी लवकर काढणार आहोत. तसेच सूर्यास्तापर्यंत ही पालखी संपवणार आहोत. सूर्यास्त झाल्यावर आरती होईल. त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पंढरपूर पालखीचे प्रस्थान सोहळा चालू होईल. पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या बैठकीत वारकऱ्यांच्या सुख सुविचार दृष्टीने अनेक निर्णय झाले, असे विश्वस्त रोहिणी पवार यांनी सांगितले.
संत गजानन महाराज पालखी
बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचे गजानन महाराज यांची पालखी आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 2 जून रोजीच निघाली आहे. यंदा पालखीचे 56 वे वर्ष आहे. पालखी सोबत 700 वारकरी, टाळ मृदुंग, पताकाधारी चालणार आहे. एका महिन्यात 700 किमी पायी प्रवास करत पालखी पंढरपूरला पोहचणार आहे. आदिशक्ती मुक्ताची पालखी आषाढीवारी निमित्त 6 जून रोजी निघत आहे. ही पालखी 600 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.