Akshay Tritiya 2024: सोने खाणार ‘भाव’! अक्षय्य तृतीयेला मुंबईत ९५० किलो उलाढालीचे संकेत

मुंबई : मुंबई हा देशाच्या सोनेबाजाराचा हब आहे. देशभरातील कच्च्या सोन्याची सर्वाधिक उलाढाल ही मुंबईतच होते. एकूण उलाढालीपैकी ६० टक्के सोन्याचे व्यवहार मुंबईतून प्रामुख्याने आयात-निर्यातीद्वारे होतात. या सर्व माध्यमांतून मुंबईतून दररोज सरासरी ४०० ते ४५० किलो सोन्याची उलाढाल होते. तर सण-उत्सवी मुहूर्तांना ती ८०० किलोपर्यंत जाते. तशीच ती यंदाच्या अक्षय्य तृतीयेलादेखील होण्याची चिन्हे आहेत. त्यात भावात घसरण झाल्याने उलाढाल दमदार होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.‘याआधी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावेळी सोन्याचा भाव प्रतितोळा ७५ हजार रुपये होता. तो आता ७१ हजार झाला आहे. त्यामुळेच अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त गाठून सोने खरेदी करण्यासाठी दमदार मागणी आहे. एरवी मुहूर्तावर होणाऱ्या खरेदीच्या तुलनेत यंदा त्यात २० टक्के वाढीची चिन्हे आहेत’, असे मुंबई ज्वेलरी असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमारपाल जैन यांनी सांगितले.

सध्या सोन्याचा भाव प्रतितोळा (१० ग्रॅम) ७१ हजार रुपये असल्याने या माध्यमातून ६५० ते ७०० कोटी रुपयांच्या उलाढालीची चिन्हे आहेत. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यंदाच्या अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या खरेदीत लहान दागिने व नाण्यांना सर्वाधिक मागणी दिसून येत आहे. नाण्यांवर घडणावळ शुल्क नसते व दागिन्यांवर ते कमी असते. त्यामुळेच भाव कमी झाले असले तरी खर्च टाळण्यासाठी सोनेखरेदीला सर्वाधिक मागणी दिसून येत आहे.
Gold Price Today: अक्षय्य तृतीयेपूर्वी भाववाढ; सोन्याला पुन्हा झळाळी तर चांदीची चमकही वाढली; पाहा आजचा दर
रिअल इस्टेटमध्येही ऑफरमुळे मागणी

भारतीय संस्कृतीत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदीला महत्त्व आहे. ही संधी साधत अनेक विकासक व बांधकाम व्यावसायिकांनी अनेक ऑफर आणल्या आहेत. १० टक्के भरून दोन वर्षे ‘नो ईएमआय’, मुद्रांकशुल्क माफ, जीएसटी माफ, २५-२५-२५-२५ योजना, २०-२०-४०-२० योजना, मॉड्युलर किचन मोफत अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी गृहखरेदीदारांकडून अक्षय्य तृतीयेनिमित्त विचारणा वाढल्याचे बिल्डर कंपन्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

चांदीला झळाळी

सोने व चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या व्यवसायासाठी नवे वर्ष अक्षय्य तृतीयेला साधारणपणे सुरू होते असे मानले जाते. ही बाब गृहीत धरल्यास मोतिलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या अंदाजानुसार, चांदीच्या मागणीत मोठी वाढ अपेक्षित आहे. सोने आणि चांदी यांच्या वाढीचे प्रमाण पाहिल्यास आजपर्यंत हे दोन्ही मौल्यवान धातू अनुक्रमे १३ टक्के आणि ११ टक्के वधारले आहेत. दोन्ही धातूंचे भाव सातत्याने वाढताना दिसत आहेत. आगामी काळात सोने प्रति १० ग्रॅम ७५ हजार रुपयांपर्यंत आणि चांदी प्रतिकिलो एक लाख रुपयांपर्यंत जाईल, असे भाकीत मोतिलाल ओसवालने केले आहे.