अजितदादांचा शिंदेंना कॉल, नाराजी व्यक्त
मुंबई: लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाणारी महायुती विधानसभेच्या तयारीला लागलेली असताना मानापमान नाट्याच्या अनेक घटना घडत आहेत. राज्यातील अनेक उद्योग, प्रकल्प बाहेर जात असताना टोयोटा किर्लोस्करचा कार निर्मिती प्रकल्प राज्यात आला. राज्य सरकारनं कंपनीसोबत सामंजस्य करार केला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांना निमंत्रण नव्हतं. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन करुन याबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसदेखील महायुतीत असल्याची आठवण त्यांनी शिंदेंना करुन दिली. फ्री प्रेस जर्नलनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

टोयोटासोबत करार केला जात असताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनादेखील निमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं. ते सोहळा संपण्याच्या काही वेळापूर्वी पोहोचले. मलबार हिल परिसरातील सह्याद्री अतिथीगृहात कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमाचं निमंत्रण अजित पवार आणि उदय सामंत यांना देण्यात आलेलं नव्हतं. कराराचा कार्यक्रम सुरु झाला, त्यावेळी पवार आणि सामंत उद्योग विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विषयांचा आढावा घेत होते, अशी माहिती अजित पवार गटातील सुत्रांनी दिली.

उद्योग मंत्रालयातील दोन्ही वरिष्ठ अधिकारी आणि एमआयडीचीचे अधिकारी बैठकीला अनुपस्थित असल्याचं अजित पवारांच्या लक्षात आलं. त्यांनी याबद्दल त्या अधिकाऱ्यांच्या कनिष्ठांना विचारलं. तेव्हा ते अधिकारी सामंजस्य करारासाठी सह्याद्रीला गेल्याचं अजित पवारांना समजलं. त्यानंतर अजित पवारांनी याबद्दल सामंत यांना विचारणा केली. ‘तुम्ही इकडे काय करताय? तुम्ही उद्योगमंत्री आहात. त्या नात्यानं तुम्ही सह्याद्रीला असायला हवं,’ असं अजित पवार सामंत यांना म्हणाले. सामंत यांच्या उत्तरावरुन त्यांनाही आमंत्रण नसल्याचं अजित पवारांच्या लक्षात आलं.घडलेल्या घटना लक्षात येताच अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कॉल केला. ‘राज्यात युती सरकार आहे आणि महत्त्वाच्या कार्यक्रमाला एकट्या मलाच नव्हे, तर उद्योग मंत्र्यांनाही वगळण्यात आलंय,’ असं अजित पवार मुख्यमंत्र्यांना म्हणाले. यावर शिंदेंनी आश्चर्य व्यक्त केलं. तुम्ही सह्याद्रीला या. तोपर्यंत कार्यक्रम संपणार नाही याची काळजी मी घेतो, अशा शब्दांत शिंदेंनी पवारांची समजूत काढली. यानंतर पवार आमि सामंत बैठक सोडून सह्याद्रीला रवाना झाले. यामुळे महायुतीत असलेला विसंवाद दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.