Ajit Pawar: कांद्यामुळे महायुतीला चार जागांवर फटका; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली, म्हणाले…

प्रतिनिधी, पुणे : कांदाप्रश्नी उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे समाधान होईल, असा तोडगा काढता न आल्याने लोकसभा निवडणुकीत पुणे, नाशिक, नगर आणि सोलापूर या चार जिल्ह्यांत महायुतीला फटका बसल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. कांदाप्रश्नी तोडगा काढावा, असे केंद्र सरकारला कळविले होते, असा खुलासाही त्यांनी केला.

विधानभवन येथे आढावा बैठकीवेळी पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी कांदाप्रश्न, तसेच राज्यसभेच्या उमेदवारीवरून रंगलेल्या नाराजी नाट्याबद्दल भाष्य केले. ‘लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदाप्रश्नाने डोके वर काढले होते. कांदा निर्यातबंदीवरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. कांदा उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे समाधान होईल, असा तोडगा काढण्याबाबत आम्ही केंद्र सरकारला कळवले होते. मात्र, तोडगा न निघाल्याने उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि रावेर वगळता इतर जागा तसेच नाशिक, पुणे, नगर आणि सोलापूर येथील जागांवर महायुतीला फटका बसला,’ अशी कबुली पवार यांनी दिली. शपथविधीवेळी अमित शहा आणि पियूष गोयल यांना पुन्हा याची कल्पना दिल्याचे पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने भाजपचा महाराष्ट्रात पराभव झाल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आर्गनायझर या मुखपत्रात केली असल्याबाबत विचारले असता, पवार यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मला चिंतनाची गरज नाही. मी नव्या उमेदीने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची टिप्पणी त्यांनी केली.
Chhagan Bhujbal: लोकसभेत ४८ पैकी राष्ट्रवादीला फक्त २ जागा, तुम्ही कसं म्हणता आमच्यामुळे फटका बसला, भुजबळ कडाडले
भुजबळ नाराज असल्याचे धादांत खोटे

राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून छगन भुजबळ नाराज असल्याचे धादांत खोटे आहे. स्वत: भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तरीही विरोधक आणि आमचा फार विचार करणारे या बातम्या पिकवतात. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनामुळे देवेंद्र फडणवीस हे सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित नव्हते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही बोलणे झाले होते. निवडणूक बिनविरोध होणार असल्याने कोणाला बोलावले नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.