अजितदादांनी शरद पवारांच्या बाजूला बसणं टाळलं; मंचावर येताच काय केलं? त्या एका कृतीची महाराष्ट्रात चर्चा!

राज्यात सध्या मनसे आणि शिवसेनेच्या युतीसह दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच आज अजित पवार आणि शरद पवार हे पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील एका कार्यक्रमात एकत्र आले होते.यावेळी या दोघांमध्ये काही संवात होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र यावेळी अजितदादांच्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं…

पुण्यात एआय तंत्रज्ञानाशी संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अजित पवार आणि शरद पवार हे उपस्थित होत्. यावेळी स्टेजवर दोन्ही नेत्यांची बैठकव्यवस्था ही एकमेकांच्या शेजारी करण्यात आली होती. मात्र, अजित पवारांनी शरद पवाराच्या शेजारी बसणं टाळलं. अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी असलेली आपली नेमप्लेट उचलली आणि तिथे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची नेमप्लेट ठेवली. यामुळे बाबासाहेब पाटील हे शरद पवारांच्या शेजारी बसले आणि अजित पवार हे पाटील यांच्या डाव्या बाजुला बसले. अजित पवारांच्या या कृतीची चर्चा आता सर्वत्र होत आहे.

याआधीही अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं होतं. २३ जानेवारी २०२५ रोजी याच व्हीएसआयच्या मंडपात अजित पवारांनी बैठक व्यवस्था बदलली होती. आता सहा महिन्यांनी याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार – मिटकरी

अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर भाष्य केलं होतं. एकत्रिकरणाचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाही. पण पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी-एकादशीपर्यंत काहीतरी होईल. 10 जून रोजी पुण्यात पक्षाचा मेळावा होणार आहे. त्यामुळे 10 तारखेपर्यंत सर्वांना वाट पाहावी, असं विधान मिटकरींनी केलं होत.

सुप्रिया सुळेंनेही दिले होते संकेत

दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते की, ‘हा फक्त माझाच निर्णय नाही. याबाबत पक्षातर्फे निर्णय घेतला जाईल. गेल्या सहा दशकांपासून महाराष्ट्राने शरद पवार यांच्या कामाची पद्धत पाहिलेली आहे. शरद पवार जो निर्णय घेतात किंवा जे मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होते. त्यामुळेच पक्षाचा जो काही निर्णय असेल तो पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच घेतला जाईल. कोणताही निर्णय आम्ही आतापर्यंत एकाधिकारशाहीने घेतलेला नाही. यापुढेही कोणताही एकर्तफी निर्णय होणार नाही.’

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)