Ajit Pawar : पक्षाला आलेले अपयश हे माझ्यामुळे, मी कमी पडलो; अजित पवारांची स्पष्टोक्ती

प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीत आम्ही अपेक्षित आकडा गाठू शकलो नाही, हा निकाल कशामुळे लागला याची चर्चा आम्ही दिवसभर केली. बारामतीमध्ये लागलेल्या निकालाने मी आश्चर्यचकित झालो आहे, ज्या मतदारसंघात मी निवडून येतो तिथल्या जनतेने मला का पाठिंबा दिला नाही, हे मला समजत नाही. पण पक्षाला आलेले अपयश हे माझ्यामुळे आले, मी कमी पडलो, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी गुरूवारी दिली. तसेच मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदारांच्या नाराजीचा जोरदार फटका आम्हाला बसल्याचे पवारांनी मान्य केले.

निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीवर मंथन करण्यासाठी गुरुवारी राष्ट्रवादी पक्षाने बैठका बोलावल्या होत्या. आमदारांच्या बैठकीनंतर संवाद साधताना अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली. राज्यातील ४८ जागांमध्ये महायुती म्हणून आम्ही कुठे कमी पडलो याची चर्चाही करण्यात येणार असून शुक्रवारी एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
Baramati News : अजित पवार सोबत नसताना खडकवासला वगळता प्रत्येकमतदारसंघात लीड, शरद पवारांची जादू, सुप्रियाताईंचा चौकार
निवडणुकीत आमचा पक्ष अपेक्षित आकडा गाठू शकला नाही, असा निकाल कशामुळे लागले याची चर्चा आम्ही दिवसभर दोन बैठकांतून केली. यातही बारामतीचा निकाल खूपच आश्चर्यकारक आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. बारामती लोकसभा मतदारसंघातील इतर विधानसभा क्षेत्र जाऊ द्या, ज्या मतदारसंघातून मी निवडून येतो, तिथल्या जनतेने मला पाठिंबा का दिला नाही, हे समजत नाही, असेही पवार यांनी अधोरेखित केले. पण नाऊमेद न होता काम करण्याचे मी सर्व पक्षातील सहकाऱ्यांना सांगितल्याचे पवार म्हणाले.
Varsha Gaikwad : माझी लहान बहीण, तिला लोकसभेत पाठवणार, उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; विजयानंतर वर्षा गायकवाड मातोश्रीवर
पराभवाच्या कारणांबाबत बोलताना पवार यांनी ४०० पारच्या घोषणेमुळे विरोधकांनी संविधान बदलाचा प्रचार केला तो जनतेवर बिंबवण्यात विरोधक यशस्वी ठरले. तर मुस्लिम समाजही आमच्यापासून दूर गेल्याने आमचा जनाधार घटल्याचे पवारांनी मान्य केले. तसेच मराठा आरक्षणाचा जोरदार फटका संपूर्ण महायुतीला बसल्याने मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर सोडले तर सर्व मतदारसंघात मविआची सरशी झाल्याचे निरीक्षण पवारांनी मांडले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांचे अजित पवार यांनी खंडन केले. काही आमदार अडचणींमुळे येऊ शकले नाही पण त्यांनी संपर्क साधून कळविले होते. जितके आमदार हजर होते त्यांनी सर्वांनी काहीही झाले तरी पक्षाची साथ सोडणार नाही हे स्पष्ट केले. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव टाळायचा असेल तर राज्यात काही निर्णय घ्यावे लागतील, असे आमदारांनी सूचविले असून त्याविषयी महायुतीच्या नेत्यांनी लवकरच चर्चा करु, असेही पवार म्हणाले.