विमान अपघातापूर्वी केबिन क्रू मेंबर दीपक पाठकने घरी फोन केला होता
Image Credit source: TV9 bharatvasrh
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला काल दुपारी ( गुरूवार, 12 जून) भीषण अपघात झाला. टेक ऑफ केल्यावर अवघ्या काही क्षणात ते खाली कोसळलं आणि होत्याचं नव्हतं झालं. यावेळी विमानात 10 केबिन क्रू मेंबर्ससह एकण 242 प्रवासी होते. अपघातात विमानातील फक्त एक प्रवासी वाचला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाला. तसेच विमान मेघानी परिसरात ज्या वसतीगृहाच्या इमारतीला धडकलं तेथील काही शिकाऊ डॉक्टरांचाही अपघातात जीव गेला. याच अपघातग्रस्त विमानात केबिन क्रू मेंबर असलेल्या बदलापूरच्या दीपक पाठकनेही जीव गमावला.
काल विमानाचे उड्डाण होण्यापूर्वी, सकाळीच तो आपल्या आईशी फोनवरून बोलला होता. ‘गुड मॉर्निंग आई’ म्हणत त्याने तिच्याशी गप्पाही मारल्या, मात्र आपण आपल्या मुलाचा आवाज शेवटचा ऐकत आहोत, याची त्या माऊलीला जराही कल्पना नव्हती. विमान अपघातात दीपकचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या गावी शोककळा पसरली आहे, अपघाताची बातमी ऐकून त्याचे मित्र आणि कुटुंबियांनी तातडीने घरी धाव घेतली. सकाळीच दीपक त्याच्या आईशी फोनवर बोलला. मातर् त्यानंतर त्याचा घरच्यांशी काहीच संपर्क झाला नाही. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबियांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे.
तेच बोलणं अखेरचं ठरलं
गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानातील क्रू मेंबर्सपैकी एक असलेल्या दीपक पाठकच्या बहिणीने सांगितले की, सकाळीच तो त्याच्या आईशी शेवटचा बोलला, तिला गुड मॉर्निंगही म्हणाला. अपघाताची बातमी आल्यापासून त्याच्याबद्दल काहीच माहिती कळली नव्हती, असेही तिने सांगितलं.
कुटुंबाचा विश्वासच बसेना
विमान दुर्घटनेची बातमी समजल्यानंतर दीपकच्या कुटुंबियांनी त्याच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, त्याचा फोन तर वाजत होता पण कोणीही फोन उचलला नाही, असे कुटुंबातील एकाने सांगितलं. जोपर्यंत तो फोन वाजत राहील, तोपर्यंत आम्ही या (त्याच्या मृत्यूच्या) वाईट बातमीवर विश्वास ठेवणार नाही, असेही ते म्हणाले.
एअर इंडियाचं विमान क्रॅश
गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडियाचे विमान मेघानी परिसरात असलेल्या मेडिकल कॉलेज कॅम्पसमधील एका वसतिगृहावर कोसळले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे.
11 वर्षांपासून एअर इंडियामध्ये होता दीपक
कालच्या अपघातात दीव गमवावा लागलेला दीपक पाठक हा बदलापूरचा रहिवासी होता, गेल्या 11 वर्षांपासून तो एअर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होता. काल सकाळी त्याने आईला फोन केला आणि गप्पा मारल्या, असं बहिणीने सांगितलं. आमच्या व्यस्त दिनचर्येमुळे आम्ही खूपदा बोलू शकत नसलो तरी, मी आणि माझी आई त्याच्याबद्दल नियमितपणे बोलतो, तो कुठे आहे, घरी आला का याची माहिती घेत असे, असेही त्यांनी नमूद केलं.
चार वर्षांपूर्वी लग्न
पाठक कुटुंबात पाच भावंडे असून, दीपकचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तर मुंबईतील पवई येथील जल वायु विहार भागात असलेले विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या घरी शोकाकुल वातावरण आहे. स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी सभरवाल यांच्या पालकांची भेट घेतली. सभरवाल यांचे वडील 88वर्षांचे आहेत.