६ जून रोजीच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास संभाजी भिडे यांनी विरोध केला आहे. तसेच रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन राजकारण करु नका ती तशीच राहू द्या असेही विधान संभाजी भिडे यांनी केले आहे.यावरुन राजकारण तापले आहे. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेड या संघटनेने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जोरदार विरोध केला आहे.
संभाजी ब्रिगेड या संघटनेने संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांनी या संदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे यांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध केला आहे त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. 6 जून ही तारीख ‘नामशेष’ करून टाका असं म्हणणं म्हणजे ज्या प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला विरोध केला होता त्यांच्याच कुळातील हा संभाजी भिडे आहे असं म्हणायला हरकत नाही. कुत्रा चावल्यामुळे या व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसत आहे असेही या पत्रकात म्हटले आहे.
मराठा-बहुजन समाजातील पोरांची डोकी भडकवण्यासाठी हा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतो आणि पोरांच्या डोक्यामध्ये धर्मांध, विकृत आणि जातीवादी विष पेरतो. हा माणूस महाराष्ट्रासाठी धोका आहे.6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा झाला होता.या घटनेला 351 वर्ष पूर्ण झाली आणि त्या दिवसाला हा माणूस जर ‘नामशेष’ करून टाका म्हणत असेल तर हा 100% शिवद्रोह आहे असेही संबाजी ब्रिगेडने म्हटले आहे..
मनोहर भिडेच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की, वेळीच मनोहरपंत भिडे यांना आवरा आणि तात्काळ येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भिडेची रवानगी करा. त्याचा खर्च संभाजी ब्रिगेड करायला तयार आहे. ही असली विकृत माणसं महाराष्ट्रात रस्त्यावर फिरणं ही धोकादायक गोष्ट आहे. कुत्रा चावल्यामुळे मनोहर पंत भिडे हे पिसाळल्यासारखं बोलत आहेत असेही संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी सांगितले.
…तर त्याची तात्काळ नसबंदी
६ जुन रोजीचा राज्याभिषेक बंद करा असं म्हणणारा नक्कीच पिसाळलेला आहे,आणि एकदा कुणी पिसाळला तर त्याची तात्काळ नसबंदी करणे समयसंमत आणि समाज हिताचे आहे. तसे न केल्यास पिसाळलेली विकृती समाजाला चावत सुटते. खबरदारी म्हणून सरकारने तत्काळ दखल घ्यावी असे राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.