अहमदाबादमध्ये गुरुवारी विमानाचा भीषण अपघात झाला, दुपारी दीड वाजेच्या सुमारास लंडनला जाण्यासाठी एअर इंडियाच्या विमानानं अहमदाबादहून उड्डाण केलं, आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणातच हे विमान एका इमारतीवर कोसळलं. या विमान दुर्घटनेत आतापर्यंत 265 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. हे विमान कोसळल्यानंतर दुर्घटनास्थळावरून विमानाचे अवशेष आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्रभर सुरू आहे. दरम्यान अहमदाबासारखी घटना जर मुंबईच्या कुर्ला बैल बाजार झोपडपट्टी परिसरात घडली तर मोठी जीवितहानी होऊ शकते अशी भीती आमदार दिलीप लांडे यांनी व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाले दिलीप लांडे?
मुंबईच्या विमानतळाजवळ मोठी झोपडपट्टी आहे. जर अहमदाबाद सारखी घटना मुंबईमध्ये या परिसरात घडली तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. कुर्ला बैल बाजार झोपडपट्टी विमानतळाच्या अगदी जवळ आहे, या ठिकाणावरून विमानं कमी उंचीवरून उड्डाणं भरत असतात. जर अशा परिस्थितीमध्ये इथे काही अपघात झाला तर मोठी दुर्घटना होऊ शकते अशी भीती दिलीप लांडे यांनी व्यक्त केली आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, हा प्रश्न मी विधानसभेत देखील उचलला आहे, तेव्हा मला एकनाथ शिंदे साहेबांनी अश्वासन दिलं होतं. आपण या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. या संदर्भात आपण आता पत्र देखील देणार आहोत. ही झोपडपट्टी तेथून लवकरात लवकर हटवली गेली पाहिजे, जर अहमदाबादसारखी एखादी घटना या परिसरात घडली तर मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने ही झोपडपट्टी लवकरात लवकर हटवावी अशी मागणी आमदार लांडे यांनी केली आहे.
दरम्यान काल अहमदाबादमध्ये जी विमान दुर्घटना घडली त्यामध्ये विमानाचे पाललट सुमित सभरवाल यांचा देखील मृत्यू झाला आहे, ते पवईमध्ये राहात होते. त्यांच्या कुटुंबाची आमदार दिलीप लांडे यांनी भेट घेतली, यावेळी ते बोलत होते. त्यांनी यावेळी झोपडपट्टी हटवण्याची मागणी केली आहे.