विजयाची इतकी खात्री, मग राज ठाकरे कशाला हवेत सोबती? मोदींनी भूतकाळ काढला, हेतू सांगितला

मुंबई: केंद्रात आणि राज्यात सरकार, दोन पक्षांत पडलेली फूट, त्यामुळे खिळखिळे झालेले दोन प्रादेशिक पक्ष या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभेची निवडणूक होत आहे. मात्र तरीही महाविकास आघाडीनं उभं केलेलं आव्हान पाहता पंतप्रधान मोदींना राज्यात अधिकाधिक सभा घ्याव्या लागत आहेत. गेल्या निवडणुकींच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. भाजपला लोकसभेसाठी मनसेची गरज भासली आहे. राज ठाकरेंचा पक्ष एकही जागा लढवत नसला तरीही ते महायुतीसाठी जोमानं प्रचार करत आहेत.

२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राज यांनी भाजपविरोधात प्रचार केला. लाव रे तो व्हिडीओ म्हणत त्यांनी घेतलेल्या सभा गाजल्या. मोदी-शहांना राजकीय क्षितिजावरुन दूर करा, ही जोडीगोळी देशासाठी घातक आहे, अशी तोफ डागणाऱ्या राज यांची तोफ यंदा मोदींसाठी धडाडत आहे. राज यांनी त्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे. भाजपला मनसेची गरज का लागतेय, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. या प्रश्नाला मोदींनी उत्तर दिलं आहे.
उद्धवजी, हिंमत असेल तर या प्रश्नांना उत्तरं द्या, जनता वाट पाहतेय! भाजपचे ५ सवाल
देशाला जो सर्वोच्च प्राधान्य देतो, त्याचे आम्ही नेहमीच स्वागत करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ‘गेल्या १० वर्षांपासून आम्ही स्वबळावर बहुमतात आहोत. पण तरीही आम्ही कायमच नव्या मित्रांचं स्वागत केलं आहे. आपल्या लोकशाहीसाठी हे चांगलं आहे. अधिकाधिक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लोकांच्या कल्याणासाठी काम करणं केव्हाही चांगलंच असतं,’ असं मोदींनी सांगितलं. ‘लोकमत’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

‘राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत. त्यांनी यापूर्वीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. आम्ही देशासाठी चांगलं काम केलं आहे. आमच्या विचारांना तसंच आमच्या द्रष्टेपणाला ते पाठिंबा देतात. राज्याच्या विकासाला ते हातभार लावू शकतील असं आम्हाला वाटतं. त्यामुळे हे एकत्र येणं केवळ सत्तेसाठी किंवा राजकीय गणितांसाठी नाही. लोकसेवा हा यामागचा हेतू आहे. देशहितासाठी जो कोणा आमच्याकडे येईल, त्याचं आम्हीस स्वागतच करु,’ असं मोदी म्हणाले.