Lok Sabha 2024: चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी सज्जता; २.२८ कोटींपेक्षा जास्त मतदार बजावणार हक्क

मुंबई : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी ११ मतदारसंघासाठी होत असलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. या टप्प्यासाठी २.२८ कोटींपेक्षा जास्त मतदार पात्र असून मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले. या टप्प्यासाठी २३ हजार २८४ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून त्यातील ८३ केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.

राज्यातील मतदानाच्या चौथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड अशा ११ मतदारसंघांत मतदान होणार आहे. या ११ जागांसाठी २९८ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक उमेदवार औरंगाबाद (४१) मतदारसंघात असून सर्वांत कमी उमेदवार नंदुरबार (११) मतदारसंघात आहेत.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; १० जूनला मतदान, अर्ज ते निकाल, कसं असेल नियोजन? वाचा
चौथ्या टप्प्यात एकूण २.२८ कोटी मतदार पात्र आहेत. यात एक हजार २७२ मतदार तृतीयपंथी आहेत. ११ मतदारसंघांत मिळून १० हजार ६०० मतदारांनी गृहमतदानाचा पर्याय स्वीकारला आहे. यात सर्वाधिक, दोन हजार ५०५ मतदार नंदुरबार मतदारसंघात आहेत. या टप्प्यासाठी ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट असून, २३ हजार २८४ कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

प्रतिबंधात्मक कारवाई

राज्यात एकूण ७८ हजार ४६० शस्त्र परवाने वितरि करण्यात आली आहेत. त्यापैकी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेसासाठी ९ मे पर्यंत ५० हजार ८३१ शस्रास्रे जमा करण्यात आली आहेत. परवाने रद्द करून एक हजार १३२ शस्रे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेली अवैध शस्रास्रे एक हजार ८५१ इतकी आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून एक लाख २२ हजार ८३४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. राज्यामध्ये १ मार्च ते ९ मे २०२४ या कालावधीत केंद्र व राज्य सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे ५९.२९ कोटी रोख रक्कम, तर ४५.७२ कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली. १६२.४० कोटी रुपयांचे मौल्यवान धातू, २४४.५९ कोटींचे ड्रग्ज, ४७ लाख रुपयांच्या विनामूल्य वाटप केलेल्या वस्तू आणि इतर १०१.६६ कोटी रुपये अशा एकूण ६१४.१४ कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
साताऱ्यात राजे अन् शिंदेंमध्ये घासून सामना; सायलेंट व्होटर गणित फिरवणार, कराड गेमचेंजर ठरणार?
तिसऱ्या टप्प्यात सरासरी ६३.५५ टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत सर्व ११ मतदारसंघात मिळून एकूण सरासरी ६३.५५ टक्के मतदान झाले. रायगड (५५.५१टक्के), बारामती (५९.५०), उस्मानाबाद (६३.८८), लातूर (६२.५९), सोलापूर (५९.१९), माढा (६३.६५), सांगली (६२.२७), सातारा (६३.०७), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (६२.५२), कोल्हापूर (७१.५९) आणि हातकणंगले (७१.११) मतदान झाले.