भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन, उच्च न्यायालयात याचिका दाखल

प्रतिनिधी, पुणे : भटक्या कुत्र्यांच्या होणाऱ्या हल्ल्यांमुळे राज्यघटनेतील जगण्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा दावा करीत ‘प्राणी जन्म नियंत्रण नियमा’च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. न्यायालयाने केंद्र, राज्याचा पशुसंवर्धन विभाग, प्राणी व पशु कल्याण मंडळ, पुणे आणि नवी मुंबई महापालिकेला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची नोटीस बजावली आहे.भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करून अंमलबजावणी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. पुण्यातील ब्रह्मा सहकारी गृहनिर्माण सोसायटी आणि नवी मुंबईतील सीवूड इस्टेट कंपनीतील रहिवाशांच्या वतीने अॅड. सत्या मुळे आणि अॅड. वैभव कुलकर्णी यांनी ही ‘रिट पीटिशन’ दाखल केली आहे.

ताडोबातील दहा वाघांचे होणार स्थानांतरण, सह्याद्री व नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात मुक्काम

याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय?

– अनेक सोसायट्यांमध्ये मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा उद्रेक वाढला आहे. त्यांच्या हल्ल्यांत लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

– भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यात ‘प्राणी जन्म नियंत्रण नियमा’तील तरतुदींमुळे अडथळे येत आहेत. त्यामुळे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे.

– हे नियम कंपनी कायदा, महापालिका कायदा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याशी सुसंगत नसून, त्यामुळे महापालिका आयुक्तांचे हात बांधले गेले आहेत, असे याचिककर्त्यांचे म्हणणे आहे.

एक जुलैला होणार सुनावणी

न्यायमूर्ती ए. एस. जैन यांच्या खंडपीठाने याचिकेची दखल घेऊन केंद्र आणि राज्य सरकारचे संबंधित विभाग, पुणे व नवी मुंबई महापालिकेला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी एक जुलैला होणार आहे.

भटक्या कुत्र्यांचा कोणीही तिरस्कार करत नाही. परंतु, राज्यघटनेनुसार मनुष्याचा जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार आणि सुरक्षिततेचा अधिकार सर्वोच्च आहे. त्यांचे उल्लंघन होता कामा नये. त्यासाठी या याचिकेतून प्राणी जन्म नियंत्रण नियमाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आले आहे.

– अॅड. सत्या मुळे, याचिककर्त्यांचे वकील