फडणवीसांना शह, ठाकरे अन् दादा अस्वस्थ; शिंदेंचा CMपदावरील दावा भक्कम
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील पुस्तकाचा कार्यक्रम आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा या दोन्हीमध्ये मुख्यमंत्रिपदाची चर्चा सर्वाधिक झाली. विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असताना महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्यमंत्रिपद कळीचा मुद्दा ठरणार असल्याचं दिसतंय. तसे संकेत सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात घडत असलेल्या घटनांवरुन मिळू लागले आहेत.राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अजित पवार आणि मुत्सद्दी देवेंद्र फडणवीसांना मागे टाकून मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदेंवरील पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला. या कार्यक्रमातून शिंदेंनी त्यांचे स्पर्धक असलेल्या अनेकांचे कार्यक्रम केल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमात झालेल्या भाषणांमधून अजित पवारांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली. शिंदे आणि फडणवीस यांना सीनियर असूनही मी मागे पडलो. ते दोघे माझ्यानंतर राजकारणात आले आणि मुख्यमंत्रीही झाले, अशा शब्दांत अजित पवारांनी खदखद व्यक्त केली.
भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्रिपद मिळणार याची कल्पना असती, तर संपूर्ण पक्ष भाजपसोबत आणला असता, असं म्हणत अजित पवारांनी त्यांची महत्त्वाकांक्षा आणि मनात असलेली बोच बोलून दाखवली. शिंदे यांच्यासोबत असलेले अनेक आमदार आणि मंत्री हे मूळचे आपले सहकारी असल्याचं त्यांनी सांगितलं. अस्थिर वातावरणात शिंदेंपेक्षा आपल्या अनुभवांचा आणि क्षमतांचा भाजपला अधिक उपयोग होऊ शकतो ही गोष्ट ठसवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या पराभवासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नियतकालिकांनी भाजपच्या अजित पवारांशी केलेल्या हातमिळणीला जबाबदार धरलं. त्यामुळे अजित पवारांच्या महायुतीमधील स्थानाबद्दल साशंकता आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपच्या विचारधारेत समानता असल्यानं त्यांच्याबद्दल तो मुद्दा येत नाही. त्यातच लोकसभेतील त्यांची कामगिरी भाजप आणि अजित पवार गटापेक्षा सरस आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात दोनदा गाठीभेटी झाल्या आहेत. मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांना मोठेपणा देऊन महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न शिंदे करत आहेत. शरद पवारांच्या भेटीमुळे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना एकाचवेळी शह दिला आहे. त्यामुळे दोन्ही माजी मुख्यमंत्री अस्वस्थ आहेत.

धारावी प्रकल्प अदानी समूहाला देण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातला समान धागा अदानी यांच्याशी जवळीक हाच आहे. शिंदे-पवार यांच्या भेटीवेळी अदानी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे ठाकरे अस्वस्थ झाले. त्यामुळे मराठा आंदोलनाप्रमाणेच धारावीवरुनही महाविकास आघाडीत गोंधळ उडू शकतो. तसे प्रयत्न शिंदेंकडून सुरु आहेत.

फडणवीसांना बाजूला सारुन शिंदे यांच्या माध्यमातून शरद पवारांशी संवाद वाढवण्याची खेळी दिल्लीतले भाजपचे खेळत आहेत. ही खेळी शिंदे यांचं महत्त्व वाढवणारी आणि फडणवीसांचं महत्त्व कमी करणारी आहे. त्यातच फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शिंदे त्यांचा मुख्यमंत्रिपदाबद्दलचा दावा भक्कम करत असल्याचे स्पष्ट संकेत गेल्या काही दिवसांतील घटनांवरुन मिळत आहेत.