नवी मुंबईत नव्या स्मार्ट प्रकल्पांचे स्वागतच, मात्र रखडलेल्या योजनांना वाली कोण?

मनीषा ठाकूर-जगताप, मुंबई : स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या नवी मुंबई शहरात अनेक ‘स्मार्ट’ प्रकल्प राबवले जात आहेत. त्यामुळे शहराचा नावलौकिक वाढत आहे. एकीकडे हे स्मार्ट प्रकल्प राबवत असताना दुसरीकडे शहरातील प्राथमिक गरजांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. नवीन रस्ते, उड्डाणपूल उभारले जात आहेत, त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे तर दुसरीकडे, प्राणीपक्ष्यांच्या गरजांकडे, त्यांना आरोग्यसुविधा देण्यात हेळसांड केली जात आहे. नवीन होणाऱ्या प्रकल्पांचे स्वागत आहेच, मात्र रखडलेल्या योजनाही मार्गी लावाव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

प्राण्यांच्या दवाखान्याची प्रतीक्षा


नवी मुंबईत प्राण्यांसाठी दवाखाना असावा, यासाठी महापालिकेच्या वतीने १५ वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. प्राण्यांच्या दवाखान्यासाठी भूखंड मिळत नव्हता. मात्र अखेरीस जुईनगर येथे भूखंड मिळाल्यावर येथे प्राण्यांसाठी प्रशस्त असा दवाखाना उभारण्यात आला आहे. मात्र तीन मजली दवाखान्याची इमारत धूळ खात पडून आहे. प्राण्यांचा दवाखाना तयार असूनही तो सुरू झालेला नाही. त्यामुळे भटक्या प्राण्यांचे उपचाराविना हाल होत आहेत.

गुजरातमध्ये वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच; क्षत्रियांपाठोपाठ कोळी, आदिवासी समाज भाजपवर नाराज

मांजरींची नसबंदी रखडली

राज्य सरकारने ज्याप्रमाणे त्या त्या महापालिकांना त्यांच्या भागातील भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी श्वान नियंत्रक कार्यक्रम राबवण्यास सांगण्यात आले आहे, त्याचप्रमाणे दोन वर्षांपूर्वी भटक्या मांजरींच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी मांजरींची नसबंदी सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. त्यासाठी मांजरींच्या नसबंदीचे केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र नवी मुंबई महापालिकेने अद्याप मांजरींच्या नसबंदी उपक्रमाला सुरुवात केलेली नाही. नजीकच्या पनवेल महापालिका हद्दीत हा उपक्रम कधीच सुरू झाला आहे, मात्र नवी मुंबई महापालिकेला यासाठी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

अन्न व औषध प्रशासनाच्या स्वतंत्र कार्यालयाची मागणी

नवी मुंबईत आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे, त्यानुसार या भागासाठी अन्न व औषध प्रशासनाचे स्वतंत्र कार्यालय असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. येथील पाचही बाजार आवारातील फळे, भाज्या, गहू, तांदूळ, खाद्यपदार्थ यांबाबत अनेक तक्रारी असतात. त्या कुठे कराव्यात, असा प्रश्न सर्वांना पडतो. ठाण्यातील कार्यालयाबाबत सर्वांना माहीत आहे. मात्र नवी मुंबईत अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय नसल्याने अनेकांना तक्रारी करता येत नाहीत. त्यामुळे अन्नपदार्थ, खाद्यपदार्थ यात होणारी भेसळ रोखता येत नाही. याबाबत तक्रार होत नसल्याने, अन्नपदार्थांमधील भेसळीचे प्रकार वारंवार होत असतात. त्यामुळे त्यांच्याबाबत तक्रार करता यावी, यासाठी नवी मुंबईत वाशीसारख्या ठिकाणी स्वतंत्र अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय असावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

प्राण्यांचा दवाखाना शहरात सुरू व्हावा, यासाठी अनेक प्राणीप्रेमी वर्षानुवर्षांपासून महापालिकेकडे मागणी करत आहेत. मात्र कित्येक वर्षे या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. आता दवाखाना बांधून तयार आहे, मात्र तरीही तो सुरू करण्यासाठी चालढकलपणा केला जात आहे. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहावे.

– सुभाष म्हात्रे, नागरिक

झालेली गोष्ट

घणसोली-ऐरोली पामबीच मार्ग उड्डाणपुलाला मान्यता

बेलापूर ते वाशी दरम्यान विस्तारलेला पामबीच मार्ग पुढे घणसोलीपर्यंत नेण्यात सिडकोला यश आले. मात्र, हा पामबीच मार्ग ऐरोलीपर्यंत नेताना खाडी परिसर व तेथील खारफुटीमुळे अनेक अडचणी सिडको व महापालिकेसमोर आल्या. घणसोली ते ऐरोली दरम्यान असलेल्या खाडीवर तब्बल साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार आहे. सीआरझेडच्या आत येत असल्याने या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यास परवानगी मिळत नव्हती. यात १० वर्षांचा कालावधी वाया गेला. घणसोली आणि ऐरोली दोन्हीकडे पाम बीच मार्ग बांधून तयार आहे. काही महिन्यांपूर्वी वन विभागाने पूल उभारण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे या मार्गातील अडथळा दूर झाला आहे आणि पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

पादचारी पूल उभारण्यास सुरुवात

ठाणे-बेलापूर मार्गावर, तुर्भे रेल्वे स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे पादचाऱ्यांना हा रस्ता ओलांडणे कठीण होते. वेगाने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमुळे अनेक अपघात येथे झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी पूल उभारण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार, येथे पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे येथील वाहतूककोंडी दूर होण्यास मदत होणार असून स्थानिकांना दिलासा मिळणार आहे.

‘डॉग पीट’ची सुविधा

सध्या अनेकजण घरात पाळीव प्राणी विशेषतः श्वानांना पाळतात. मात्र या श्वानांना सकाळ, संध्याकाळी नैसर्गिक विधीसाठी उद्यानात किंवा पदपथांवर घेऊन जावे लागत होते. कुठेही नैसर्गिक विधी करत असल्याने, सर्वत्र श्वानांच्या नैसर्गिक विधीमुळे घाण पसरत होती. त्यामुळे महापालिकेच्या वतीने श्वानांच्या नैसर्गिक विधीसाठी डॉग पीट अर्थात त्यांच्या नैसर्गिक विधीसाठी खास जागा तयार करण्यात आल्या आहेत. यासाठी त्यांच्यासाठी वाळू टाकण्यात आली आहे. अनेक प्राणीप्रेमींनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. शहरात १० ठिकाणी अशी सुविधा तयार करण्यात आली आहे.

अनेक वर्षे रखडलेल्या घणसोली-ऐरोली जोडपुलाच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीला वेगळा पर्याय मिळणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक विभाजित होऊन वाहतूककोंडीही कमी होणार आहे, याचा जास्त आनंद आहे.

– रुपाली परते, रहिवासी