केवळ खाडीमुळे पाणीवाटपात भेदभाव, डोक्यावरून हंडे-कळशा किती काळ वाहायच्या? गोराईकरांचा सवाल

मुंबई : गोराईच्या खाडीमुळे एकाच शहरात, एकाच मतदारसंघात नांदणाऱ्या नागरिकांच्या जगण्यात किती मोठा फरक येतो ते या भागात फिरताना लक्षात येते. गोराई गावाच्या समुद्राला लागून असलेल्या अप्पर कोळीवाड्यामध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’ची टीम पोहोचली तेव्हा नुकताच महापालिकेचा टँकर आला होता. हा टँकर किनाऱ्यावरून येतो. अप्पर कोळीवाड्याच्या काही भागापर्यंत टँकर जायला रस्ताच नाही.भरतीवेळी टँकर गावात पोहोचू शकत नाही. अशा वेळी, खासगी वितरकांवर अवलंबून राहावे लागते. अप्पर कोळीवाड्यापर्यंत जाण्यासाठी लहान टेम्पोचालक सहाशे रुपये मागतात, असे येथील स्थानिकांनी सांगितले. डोक्यावरून हंडे-कळशा किती काळ वाहायच्या? या कोळीवाड्यात एकमजली आणि दुमजली घरेही आहेत. वरच्या मजल्यांपर्यंत पाणी चढवण्यासाठी कसरत करावी लागते. एखाद्या वेळी घरात पाणी भरून ठेवण्यासाठी कुणी नसले, तर मग पाण्यासाठी गावभर वणवण करण्याची वेळ येते.

प्रवाशांविनाच पीएमपी सुसाट; रात्री नऊनंतर तपासनीस गायब, चालकांवरील कारवाईवर प्रशासनाचे दुर्लक्ष
लोअर कोळीवाड्यातही हीच स्थिती आहे. मुंबईकर म्हणवून घ्यायचे आणि टँकरचे पाणी वापरायचे, ही परिस्थिती नेमकी कधी बदलणार… हक्काच्या पाण्यासाठी आणखी किती काळ वाट पाहायची. गोराई-भाईंदर रस्त्यावर शेफाली गावापर्यंत जलवाहिनी आलेली आहे. मात्रयामधून पाणी मात्र पुरेशा दाबाने येत नसल्याने ते घरांमध्ये पोहोचत नाही. शेफालीजवळ हायड्रंटही लावले आहेत. या हायड्रंटमुळे पाणी अधिक दाबाने येणे अपेक्षित आहे. कुणी नेतेमंडळी, अधिकारी या भागात येणार असले की, घरातील नळांना पाणी येते. मग इतर वेळी का नाही, अशी संतप्त विचारणा स्थानिक करतात. पावसाळ्यात पाणी मिळते. मग इतरवेळी ही समस्या का? पी उत्तर विभागापेक्षा आर मध्य विभागाकडून पाणी मिळाले, तर कष्ट काहीसे कमी होतील, अशीही सूचना नागरिकांकडून केली जाते.

गोराई गावातील वरची डोंगरी येथील अवस्था अधिकच बिकट आहे. येथे डोंगरउतारावर घरे वसलेली आहेत. येथे दोन ठिकाणी बोअरिंगची सोय आहे. मात्र त्यातील एकालाच पाणी येते. अरुंद रस्त्यामुळे या पाड्यापर्यंत टँकर पोहोचत नाही. त्यामुळे बोअरिंगच्याच पाण्यावर स्थानिकांना अवलंबून राहावे लागते. तीन-चार तासांच्या मध्यंतरानंतर पंप चालू करून पाणी सोडले की, त्यातल्या त्यात पाण्याची धार मोठी असते. पण एका घरापुरते पाणी जेमतेम भरून झाले की, मग पुढच्या घराला पाणी मिळण्यासाठी पुन्हा तीन-चार तास थांबावे लागते. खाडीजवळ असल्याने काही वेळा खारे पाणी येते. मात्र ते खारे पाणी पिण्याशिवाय अन्य पर्याय नसतो, असे येथील स्थानिक आदिवासी सांगतात.

या भागांमधील विहिरींची अवस्था अत्यंत वाईट आहे. आजुबाजूला कचरा साचलेला असल्यामुळे आरोग्यसमस्या उद्भवतात. काही ठिकाणी कपडे धुण्यासाठी स्थानिक तळ्यावर जातात. पाणी मिळाले नाही, तर आहे तो उपाय वापरण्याशिवाय अन्य पर्याय काय? असा प्रश्न हे स्थानिक करतात. आजच्या काळातील जागतिक शहरामधील ही परिस्थिती खाडीच्या पलिकडच्या, म्हणजेच रेल्वे स्टेशनच्या किनाऱ्यावरच्या रहिवाशांनी स्वीकारली असती का, एवढ्याच प्रश्नाचे उत्तर लोकप्रतिनिधींनी द्यावे, ही त्यांनी अपेक्षा आहे.