प्रवाशांविनाच पीएमपी सुसाट; रात्री नऊनंतर तपासनीस गायब, चालकांवरील कारवाईवर प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) चालक रात्री नऊ वाजल्यानंतर प्रवाशांना न घेताच मोकळी बस दामटवत आहेत. प्रवाशांनी हात केला, तरी तिकडे दुर्लक्ष करून बस सुसाट घेऊन जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रात्रीच्या वेळी घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत बसलेल्या प्रवाशांना बस उभी न राहिल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकरणी पीएमपी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्दीत पीएमपीमार्फत सकाळी ५.३० ते रात्री ११.३०पर्यंत सेवा दिली जाते. चाकरमानी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर बसचा वापर करतात. एका दिवसात पीएमपीतून ११ ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात; पण गेल्या काही दिवसांपासून पीएमपी बसचालकांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. काम संपून रात्री नऊनंतर घरी निघालेल्या प्रवाशांना थांब्यावर बस उभीच राहत नसल्याचा अनुभव येत आहे.

शहरी मतदानाचे टक्केटोणपे
घरी जाण्याच्या गडबडीत असलेले नागरिक आपली बस आली म्हणून हात करतात; पण चालक थांब्यावर बस उभी न करता सुसाट बस घेऊन जातात. बहुतांश चालक शेवटची फेरी लवकर संपविण्यासाठी असे करीत असण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी बसची संख्या कमी असते. थांब्यावर उभे राहून बस मिळत नसल्यामुळे चिडचिड होते. शेवटी प्रवाशांना रिक्षाला जास्त पैसे देऊन घर गाठावे लागत असल्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक फटकादेखील सहन करावा लागत आहे.

रात्री नऊनंतर तपासनीस गायब

‘पीएमपी’चे तिकीट तपासनीस (चेकर) रात्री आठनंतर गायब असतात. याची माहिती चालकांना असते. त्यामुळे तेदेखील निवांत असतात. त्यामुळे मार्गावरील एक-दोन थांब्यांवर बस उभी न करताच ते निघून जातात. कधी कधी बसमधील दिवेही बंद केले जातात. त्यामुळे प्रवाशांना कोणत्या मार्गावरील बस आहे हे समजत नाही. पीएमपी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.

कारवाईकडे दुर्लक्ष

पीएमपी प्रशासनाकडून प्रत्येक थांब्यावर प्रवासी घेण्यासाठी बस थांबविण्याच्या सूचना वारंवार चालकांना केल्या जातात. मात्र, चालक त्या गांभीर्याने घेत नाहीत. त्यांची तक्रार करायला प्रवाशांना वेळ नसतो. त्यात तक्रार आली, तरी चालकांवर कारवाई होत नाही. त्यामुळे अलीकडे चालकांचे धाडस वाढले आहे. त्यामुळे पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी मार्गावर फिरून याची पाहणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

रामवाडी मेट्रो स्टेशनजवळून खराडीला जाण्यासाठी उभे असताना खराडीची बस तेथील थांब्यावर उभी राहिली नाही. याबाबत ‘पीएमपी’कडे तक्रार केली; तरीही काहीही सुधारणा झाली नाही. बस न मिळाल्यास रिक्षाला जादा पैसे देऊन प्रवास करावा लागतो.

– सुदर्शन साठे, खराडी

‘पीएमपी’च्या सर्व चालकांना प्रवासी असलेल्या थांब्यावर बस उभ्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत; तरीही अशी तक्रार आल्यास संबंधित चालकांवर कठोर कारवाई केली जाईल. वाहतूक विभागालाही याबाबत सूचना दिल्या जातील.

– डॉ. संजय कोलते, अध्यक्ष, पीएमपी