यंदा ‘मी पुन्हा येईन’ नाही! भाजपची स्ट्रॅटर्जी ठरली; शिंदेंच्या CM पदाबद्दलही निर्णय झाला

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या महायुतीनं आता राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. विधानसभेचं जागावाटप लवकर मार्गी लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीत जागावाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ बरेच दिवस चाललं. त्याचा फटका महायुतीला निवडणुकीत बसला. मिशन ४५ हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीसांची मी पुन्हा येईन घोषणा गाजली होती. या घोषणेच्या माध्यमातून फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे आपणच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं. फडणवीसांची घोषणा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. पण निवडणुकीचा निकाल लागला आणि शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरत वेगळी भूमिका घेतली. उद्धव ठाकरेंनी थेट काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आणि अडीच वर्षे भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं.
Mahayuti Seat Sharing Formula: जागावाटपात भाजपच दादा! शिंदेसेना, दादांना किती जागा? महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित
मागील निवडणुकीतील अनुभव पाहता यंदा भाजपनं विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यात स्वबळावर २८८ जागा लढण्याची वेळ आता निघून गेली असल्याची कल्पना भाजपला आहे. त्यामुळे महायुतीत राहून विधानसभा लढवण्याबद्दल भाजप ठाम आहे. १५५ ते १६० जागा लढवायच्या असा निर्णय भाजप नेत्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे शिंदेसेना, अजित पवार गट आणि अन्य लहान पक्षांना १२८ ते १३३ जागा मिळतील. जे आमदार ज्या पक्षातून निवडून आले आहेत, त्या जागा त्याच पक्षाला मिळतील. बाकीच्या जागांचं वाटप कसं करायचं इतकाच विषय शिल्लक राहिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

एकनाथ शिंदे हेच निवडणुका होत असताना मुख्यमंत्री म्हणून राहतील. त्यात कोणताही बदल होणार नाही. भाजपनं कधीही कोणाचं नाव पुढे करुन कोणत्याही राज्यात विधानसभेच्या निवडणुका लढवलेल्या नाहीत. एकहाती सत्ता असलेली राज्यं असो वा मित्रपक्षांसोबत सरकारं असलेली राज्यं असो भाजपनं निवडणुकीच्या आधी कधीही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाणार नाही, असं भाजपमधील सुत्रांनी सांगितलं.