राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यासाठी भाजपामध्ये खांदेपालट, अंधारेंची सडकून टीका

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांत विरोधकांच्या फेक नरेटिव्हचा जनसामान्यांवर मोठा परिणाम पडल्याने महायुतीच्या जागा घटल्याचा दावा भाजपसहित शिंदेसेना आणि अजित पवार यांनी केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने माध्यमांशी बोलण्यासाठी दमदार शिलेदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार सकाळी आणि संध्याकाळी माध्यमांशी कुणी बोलायचे याचे नियोजन पक्षाने केले आहे. या यादीतून विरोधकांवर सतत प्रहार करणारे आमदार नितेश राणे, आक्रमक नेते निलेश राणे तसेच माजी खासदार नवनीत राणा यांना वगळण्यात आले आहे. हाच धागा पकडून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी डिवचणारी पोस्ट केली आहे.

राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यासाठी भाजपामध्ये खांदेपालट

भडकाऊ, चिथावणीखोर आणि समाज विघटित करणारे वक्तव्ये महाराष्ट्रात पेरण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळ दुपार संध्याकाळ वक्तव्ये देणाऱ्या लोकांची यादी तयार केली आहे. महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी भाजपाने खांदेपालट करत आता नव्या लोकांना जबाबदारी दिली आहे, अशा शब्दात भाजपच्या नव्या यादीवर सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.
विधानसभेचे जागा वाटप राज्यातच, ठाकरे पवारांशी लवकरच चर्चा, नाना पटोले यांनी निवडणूक रणनीती सांगितली

त्यांचे प्रभावक्षेत्र क्षीण झालंय, याची भाजपला खात्री पटलीये

कदाचित नितेश राणे, निलेश राणे, चित्रा वाघ, नवनीत राणा ही मंडळी नुसतीच कर्णकर्कश ओरडतात. मात्र यांचे प्रभावक्षेत्र अगदीच क्षीण झाले आहे, याची खात्री भाजपाला सुद्धा पटली आहे. म्हणूनच की काय आता सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याची जबाबदारी भाजपाच्या या नव्या लोकांना दिली आहे, असा टोला अंधारे यांनी लगावला आहे.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचेही भाजपच्या यादीत नाव

दुसरीकडे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सुद्धा अधिकृतरित्या भाजपच्या लेटरहेडवर दिसत आहेत. तसेच त्यांचे चिरंजीव अॅड अनिकेत निकम यांचेही नाव भाजपच्या यादीत दिसत असल्याने सुषमा अंधारे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. निकम हे पहिले विशेष सरकारी वकील असतील जे राजकीय पक्षाची भूमिका मांडतील. जे लोक संविधान बदल करणार नाही असे म्हणतात, तेच लोक आपल्या कृतीतून कायदा कसा मोडत आहेत, तेच आपल्याला दिसते, असे अंधारे यांनी म्हटले.