मुंबईत विनाकारण फिरण्यापेक्षा मतदारसंघात जा; उमेदवारीचा एकच निकष, शिंदेंच्या कठोर सूचना

प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमध्ये विनाकारण फिरण्यापेक्षा आपापल्या मतदारसंघात तळ ठोकून कामे करा, आपल्या वक्तव्यामुळे महायुतीत बेबनाव होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या, अशा सूचना करतानाच जागावाटपात मतदासंघांची अदलाबदल झाल्यास तशाही परिस्थितीत निवडणूक लढवून जिंकण्याची तयारी ठेवा, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना गुरुवारी इलेक्शन मोडवर आणले.

यावेळी ११० विधानसभा मतदारसंघांवर निरीक्षक नेमण्याची घोषणा करीत महायुतीत ११० जागा लढविण्याचे संकेतही त्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या काय सूचना?

आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित आमदार, मंत्री आणि पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतानाच काही सूचनाही केल्या. ही बैठक जवळपास ४ तास चालली.
Sanjay Raut : दीड हजारात मुख्यमंत्र्यांचं घर चालतं का? लाडक्या भावांप्रमाणे बहिणींनाही १० हजार द्या, संजय राऊतांची मागणी
या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाच्या आमदारांना आपापल्या मतदारसंघात तळ ठोकून बसण्याच्या सूचना केल्या. ज्यांचे मुंबई, मंत्रालयात फारसे काम नाही त्यांनी विनाकारण मतदारसंघ सोडून फिरण्यापेक्षा मतदारसंघातच ठाण मांडून बसले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

एकच निकष तिकिटाचा

निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यालाच आपण उमेदवारी देणार असल्याने मतदारसंघात जेवढी ताकद वाढवता येईल तेवढी वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना यावेळी शिंदे यांनी दिल्याचे समजते. विधानसभा निवडणूक महायुतीमध्येच लढवायची नसल्याने महायुतीमध्ये बेबनाव निर्माण होईल अशी वक्तव्य भाषणांमध्ये वा प्रसारमाध्यमांपुढे करण्याचे टाळा असा सल्लाही त्यांनी दिला.
Amol Kolhe : दादांचा शिलेदार काकांच्या ताफ्यात, ठाकरेंचे शिवसैनिक नाराज, अमोल कोल्हेंचा जनता दरबार रद्द

शिवसेना लढवणार ११० जागा?

महायुतीतर्फे शिवसेना ११० जागा लढविण्याच्या तयारीत असून त्यानुसार त्यांनी ११० विधानसभा निरीक्षकही नेमण्याबाबत या बैठकीत सूचना दिल्याचे समजते. शिवसेनेला विधानसभेत जास्तीतजास्त जागा मिळाव्यात यासाठीच शिंदे यांची ही रणनिती असल्याचे समजते. यासाठी ते भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडे आग्रह कररणार असल्याचे समजते.

ठाकरे गटाची मोर्चेबांधणी सुरु

दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत मुंबईतील तीन मतदारसंघात विजय मिळवणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आता आगामी विधानसभा निवडणुकीतही मुंबईत दबदबा कायम राखण्यासाठी मुंबईतील ३६ पैकी २५ विधानसभा मतदारसंघ निवडले आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात या जागा पदरात पाडून घेण्याची आवश्यक ती मोर्चेबांधणीही त्यांनी सुरु केल्याचे समजते.