लोकसभेत सुसाट सुटलेल्या मविआला विधानसभेआधी धक्का; पवारांचा ‘नो रिस्क, मोर गेन’ प्लान फसला

मुंबई: लोकसभा निवडणुकीत १० जागा लढवत ८ निवडून आणणाऱ्या शरद पवार गटाला विधान परिषदेत धक्का बसला. परिषदेच्या निवडणुकीत पवार गटाच्या पाठिंब्यावर लढलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यांना केवळ १२ मतं मिळाली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षाचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीतील मतांच्या आधारावर निवडून आले. दादांनी स्वत:च्या आमदारांची मतं राखत बाहेरुन ५ मतं खेचली आणि दोन्ही जागा जिंकल्या.

शरद पवार गटाकडे १२ आमदार आहेत. त्यांनी शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला. पाटील हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाच्या एकत्रित ताकदीवर निवडून येऊ शकत होते. पण ठाकरेंनी त्यांचे राईट हँड मिलिंद नार्वेकरांना रिंगणात उतरवलं आणि निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालं. नार्वेकर आणि पाटील यांचे सर्वपक्षीय संबंध पाहता निवडणूक रंगतदार होणार हे स्पष्ट झालं.
MLC Election 2024: कॅबिनेट बैठकीला गैरहजर, चहापानाला दांडी; दादांचं फूलप्रूफ प्लानिंग, काकांची चाल कशी उधळली?
संख्याबळ नसताना जयंत पाटील यांना पाठिंबा देत शरद पवार ‘नो रिस्क, मोर गेन’वाला डाव खेळले. आम्ही लहान पक्षांना सन्मान देतो, असा मेसेज त्यांनी दिला. आता पाटील जिंकले असते तर त्याचं श्रेय पवारांना मिळालं असतं. पण तसं झालं नाही. पाटील पराभूत झाले. पण त्यामुळे पवारांचं फार मोठं नुकसान झालं नाही. पाटील यांच्या जागी पवारांच्या पक्षाचा उमेदवार पडला असता, तर ती पवारांसाठी मोठी नामुष्की ठरली असती.
MLC Election 2024: …तर सातवही दुसऱ्या फेरीत गेल्या असत्या! काँग्रेसमध्ये मोठा दगाफटका, नामुष्की थोडक्यात टळली
लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटात अस्वस्थतता असून दादांचे आमदार माघारी परततील अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. दादांचे आमदार विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग करतील अशी वदंता होती. पण तसं काहीच घडलं नाही. त्यामुळे दादांची पक्षावर, आमदारांवर असलेली पकड स्पष्ट झाली. लोकसभेतील पराभवानंतरही आमदार दादांच्या सोबत असल्याचा मेसेज यामुळे गेला.

जयंत पाटील यांच्या पराभवामुळे महाविकास आघाडीला काहीसा ब्रेक बसला आहे. लोकसभेला राज्यात ३० जागा जिंकणाऱ्या महायुतीची गाडी सुसाट होती. पण आता विधान परिषदेत मविआच्या उमेदवाराचा झालेला पराभव विरोधकांच्या एकीवर प्रश्न निर्माण करणारा आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण करण्यात महायुती यशस्वी ठरली आहे. दादांचे काही आमदार क्रॉस व्होटिंग करतील आणि जयंत पाटील विजयी होतील, असं गणित शरद पवार गटानं आखलं होतं. पण तसं काहीच घडलेलं नाही. उलट अजित पवारांनी बाहेरुन ५ मतं आणत मविआला धक्का दिला आहे.