मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकात रेल्वे रुळाला तडा, लोकल ट्रेन २५ ते ३० मिनिटं उशिराने

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन सतत २० ते २५ मिनिटं उशिराने धावत आहेत. त्यातच शुक्रवारी मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेला होता. १ वाजून ५ मिनिटांनी माटुंगा फलाट क्रमांक १ डाउन जलद मार्गावर रुळाला तडा गेल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली होती. याचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

१ वाजून ५ मिनिटांनी माटुंगा रेल्वे स्थानकांत रुळाला गेला होता. त्यानंतर तात्काळ दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं. १ वाजून ४० मिनिटांनी माटुंगा रेल्वे स्थानकांतील रुळावर दुरुस्ती करण्यात आली. यादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात आली होती. यामुळे मध्ये रेल्वेवरील वाहतूक जवळपास २५ ते ३० मिनिटं उशिराने होती. ठाणे ते सीएसएमटी एक तास २५ मिनिटं उशिरा धावत होती. तर भायखळा ते सीएसएमटी लोकल २५ मिनिटं उशिराने धावत होत्या. एका मागे एक ट्रेनच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता रेल्वे रुळाला गेलेला तडा दुरुस्त करण्यात आला असून लोकल सुरू झाल्या आहेत. मात्र दुरुस्तीनंतरही लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून ट्रेन उशिरा धावत आहेत.
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, एसी लोकलबाबत मध्य रेल्वेचा मोठा निर्णय
दरम्यान, आठ दिवसांपूर्वीही मुलुंड आणि नाहूर या रेल्वे स्थानकांदरम्यान दोन रुळ जोडणीच्या ठिकाणी तडा गेला होता. रात्रीच्या दरम्यान ही घटना घडली होती. त्यामुळे कामावरुन रात्री उशिरा निघालेल्या चाकरमान्यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला होता. रात्री १० वाजून १५ मिनिटांनी रुळाला तडा गेला होता. त्यानंतर दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर रात्री १० वाजून ५० मिनिटांनी पहिली ट्रेन रवाना झाली होती.

दरम्यान, मागील जवळपास महिनाभरापासूनच मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर, कर्जत, खोपोली येथून सुटणाऱ्या लोकल ट्रेन बऱ्याच उशिराने धावतात. सकाळच्या गडबडीच्या वेळेसह, दुपारच्या वेळेतही बदलापूर, कर्जतवरुन येणाऱ्या लोकल कधी २० ते २५ मिनिटं, तर कधी अगदी ४० मिनिटंही उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.