‘मोठा भाऊ’ भाजपचा विधानसभेसाठी मोठा दावा; शिंदे, दादांना किती जागा सोडण्याची तयारी?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात सपाटून मार खावा लागला. जागावाटप, उमेदवारांची निवड, त्यांच्या नावांची घोषणा यामध्ये महायुती मागे पडली. त्याचा फटका लोकसभेला सत्ताधाऱ्यांना बसला. मिशन ४५ हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. अधिकाधिक जागा लढवण्यासाठी भाजपनं घेतलेला आक्रमक पवित्रा त्यांना महागात पडला. आता विधानसभेच्या तोंडावरही भाजपनं तोच आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. भाजपचे स्थानिक नेते १८० जागा लढवण्यासाठी आग्रही आहेत. जागावाटपात १८० च्या खाली येऊ नका, अशी विनंती त्यांनी केंद्रीय नेतृत्त्वाकडे केली आहे.

महायुतीत भाजप मोठा भाऊ आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे १०५ उमेदवार निवडून आले होते. ते पाहता भाजपनं राज्यात १८० जागा लढवाव्यात. विधानसभेला जागावाटप करताना १८० च्या खाली येऊ नये, असा आग्रह भाजपच्या राज्यातील नेत्यांनी प्रभारी आणि सहप्रभारी यांच्याकडे धरला आहे. त्या अनुषंगानं बैठकांचं सत्रदेखील सुरु झालं आहे. शिंदेसेनेला ६० ते ७० जागा सोडल्या जाव्या आणि उर्वरित जागा अजित पवार गटाला देण्यात याव्या, अशी भाजप नेत्यांची मागणी आहे.
एका पदावर तिघांचा दावा; ‘पॉवर’फुल खुर्चीसाठी एकजूट होईना महायुती; हातातून ‘कंट्रोल’ जाणार?
विधानसभा निवडणुकीत १८० जागा लढवून १२० ते १२५ जागा जिंकण्याचा भाजपचा प्लान आहे. अशा परिस्थितीत भाजप मित्रपक्षांवर कमीत कमी अवलंबून राहू शकतो. तोच विचार करुन जागावाटप करण्यात यावं असा भाजप नेत्यांचा आग्रह आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतील सर्वाधिक स्ट्राईक रेट राखलेली शिंदेसेना १०० जागांसाठी, तर अजित पवार गट ८० ते ९० जागांसाठी आग्रही आहे. पण भाजप मित्रपक्षांना इतक्या जागा सोडण्याच्या मनस्थितीत नाही. दोन्ही मित्रपक्षांना मिळून १०० ते ११० जागा सोडण्याची भाजपची तयारी आहे. यावरुन महायुतीत खटके उडू शकतात.

सध्याच्या घडीला संख्याबळाचा विचार केल्यास महायुतीकडे २०० आमदार आहेत. यात भाजपचे निम्म्याहून अधिक आमदार आहेत. भाजपसोबत लहान पक्ष आणि अपक्ष आहेत. त्यामुळे त्यांचा आकडा ११५ च्या आसपास जातो. त्यामुळे जागावाटप करताना भाजप विद्यमान आमदारांच्या जागा आपल्याकडे ठेवेल. शिंदेसेना, अजित पवार गटालाही विद्यमान आमदारांच्या जागा दिल्या जातील. अशा पद्धतीनं २०० जागांचं वाटप होईल. उर्वरित ८८ जागांपैकी निम्म्या जागा भाजप लढवेल आणि बाकीच्या जागा दोन मित्रपक्षांना दिल्या जातील, अशी शक्यता आहे.