वाडकरांच्या पुतणीला चिरडलं, मराठी फिल्म इंडस्ट्री मूग गिळून का? हे कसलं मराठीपण? राऊत भडकले

मुंबई : वरळीतील हिट अँड रनच्या घटनेत मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांच्या पुतणीला जीव गमवावा लागला. मात्र प्रत्येक गोष्टीवर कमेंट करणारी मराठी सिनेसृष्टी आता कुठे गेली? आपल्या सहकाऱ्याचे नातेवाईक रस्त्यावर चिरडून मृत्युमुखी पडल्यावरही तुम्ही मूग गिळून गप्प कसे बसता? कसलं मराठीपण आहे तुमच्यात? असे सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विचारले आहेत.

वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाला अटक करण्यात आली असून त्याचे पिता राजेश शहा हे शिवसेना शिंदे गटातील उपनेते आहेत.
Puja Khedkar : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत फोटो ते ‘ऑडी’ची गोडी; IAS अधिकारी पूजा खेडकरची उचलबांगडी

संजय राऊत काय म्हणाले?

वरळीत गाडीखाली चिरडून कावेरी नाखवा यांची हत्या करण्यात आली. मुंबई पोलिसांना तीन दिवस आरोपी सापडत नव्हता, हे ऐकून कुणाला तरी खरं वाटेल का? त्याच्या शरीरातील नशेचा अंमल मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये, यासाठी तीन दिवस त्यांना फरार ठेवण्यात आलं, पण व्हिडिओ-सीसीटीव्ही फूटेज सांगतंय की या मुलाने कशी नशा केली होती, हा मुलगा गुन्हेगार आहेच, त्याचा बापही गुन्हेगार असल्याचं मला कळतंय. त्याने कोणत्या प्रकारची नशा केली होती, कोणत्या बारमध्ये होता, हेही समोर येत असल्याचं संजय राऊत म्हणाले.

अपघात झाल्यावर बाप सांगतोय मुलाला की पळून जा आणि ड्रायव्हरला गाडीवर बसव. त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब गुन्हेगार आहे. या मुलाला मुंबई पोलिसांनी सजा-ए-मौत.. फाशीची शिक्षा मागायला हवी. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली.
Pune Hit and Run : हरवलेली मुलगी पालकांकडे सोपवली, अर्ध्या तासात कारने चिरडलं, देवदूताच्या मृत्यूने हळहळ

मराठी सिनेसृष्टीला सवाल

मयत कावेरी नाखवा या मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांच्या नातेवाईक आहेत. मी आज वाचलं त्यांच्याविषयी. कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? एरवी आपल्या कॉमेंट देत असते किंवा सामाजिक कार्य करते.. बोललं पाहिजे ना… कसला टाळकुटेपणा करतेय मराठी फिल्म इंडस्ट्री? आपल्या मराठी सिनेसृष्टीतील एका सहकाऱ्याचे नातेवाईक अशा प्रकारे रस्त्यावर चिरडल्यावर तुम्ही मूग गिळून गप्प बसता, कसलं मराठीपण आहे तुमच्यात? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

पुणे, मुंबई, नागपूर अशा विविध ठिकाणी या घटना वाढत आहेत, ही हत्या आहे.. हा अपघात नाही.. ज्याप्रकारे मद्यधुंद अवस्थेत एखादी व्यक्ती गाडी चालवते आणि वारंवार एका महिलेला चिरडते, तेव्हा ही हत्या असते, हत्येचा गुन्हा दाखल होऊन खटला चालायला हवा, अशी मागणीही राऊतांनी केली.