दादांनी काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीकाराकडे दिली विधानसभेची जबाबदारी; ९० दिवसांचा प्लान ठरला

मुंबई: लोकसभेनंतर राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यानंतर पुढील दोन महिन्यांत विधानसभा निवडणूक असेल. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यास पक्षानं सुरुवात केली आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. याच दरम्यान सोमवारी राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांची एक बैठक झाली. त्यात निवडणुकीच्या तयारीवर चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादा गटानं नरेश अरोरा यांची निवडणूक रणनीतीकार म्हणून नियुक्ती केली आहे.

कोण आहेत नरेश अरोरा?
नरेश अरोरा पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनी design boxed.com चे सहसंस्थापक आहेत. त्यांनी राजस्थान, कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेससाठी निवडणूक प्रचाराचं काम पाहिलं आहे. प्रचार व्यवस्थापनात त्यांचा हातखंडा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या कालच्या बैठकीला अरोरा उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचं ब्रँडिंग आणि रणनीतीची सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रेझेंटेशनदेखील देत आमदारांना संबोधित केलं.
Mumbai Hit and Run: …तर माझी कावेरी वाचली असती हो! पतीचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो; आक्रोश ऐकून उपस्थित सुन्न
महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी नुकताच अर्थसंकल्प मांडला. त्यातून अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या. त्या सगळ्या योजनांचा प्रचार करण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. याशिवाय मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ९० दिवसांची योजना तयार करण्यात आली आहे. पक्षाचा नेता म्हणून अजित पवारांचं ब्रँडिंग करण्यात येईल. त्यांच्या मेकओव्हरवर काम केलं जाईल. अजित पवारांची प्रशासनावरील पकड, शब्दावर ठाम राहण्याची वृत्ती, आश्वासनं पाळण्याची सवय, पक्षाच्या केडरसाठी कायम उपलब्ध राहण्याचं कौशल्य या गोष्टी मेकओव्हरमधून अधोरेखित केल्या जातील.

राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवा, त्यांचा लाभ अधिकाधिक लोकांना कसा मिळेल ते पाहा. केवळ विकासाच्या अजेंड्यावर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, रामराजे निंबाळकर, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे वरिष्ठ नेते उपस्थित होते.