‘या प्रकरणावर बोलण्यात काही अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीआधी पक्ष बदलून ते सत्ताधारी पक्षाबरोबर गेले तेव्हाच त्यांनी याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांनाी क्लीन चिट देऊन फाइल बंद केली यात नवल वाटण्यासारखे काही नाही,’ असे पटोले म्हणाले.
‘पुण्यात वाहतूक शाखेतील एका पोलिस महिलेला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यात कायदा सुव्यवस्था कुठे राहिली आहे? महाराष्ट्र पोलिसच सुरक्षित नाहीत ही परिस्थिती आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त घोषणा करतात कृती मात्र काहीच नाही. तुरुंगातील आरोपींना व्हीआयपी वागणूक मिळते, ससून रुग्णालयात उपचारांच्या नावाखाली आरोपींना पंचतारांकित सुविधा दिली जाते,’ असा आरोपही त्यांनी केला.
‘शिंदे, फडणवीस, पवार ‘हिट विकेट’ होणार’
‘दोन वर्षांपूर्वी आम्हीही विकेट काढली होती,’ असे वक्तव्य भारतीय क्रिकेटपटूंच्या सत्कारादरम्यान मुख्यमंत्र्यांनी केले. यावर पटोले म्हणाले, ‘७० दिवसांनंतर खरी मॅच सुरू होणार आहे, दोन वर्षांपूर्वी जे झाले तो लपवाछपवीचा, खोक्यांचा खेळ होता. आता खरा सामना लोकांच्या दरबारात होणार आहे. नागरिकांची काळजी नसलेले मुख्यमंत्री सध्या सत्तेत आहेत, सरकारच अदानीसाठी काम करत असून, आता लोकच खोके सरकारचा ‘कॅच’ घेणार आहेत. या मॅचनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे ‘हिट विकेट’ होणार आहेत,’ असा टोलाही पटोले यांनी लगावला.