विधान परिषद निवडणुकीत कोणाचा गेम? क्रॉस व्होटिंगचा धोका, ‘त्या’ तिघांची नाराजी महागात पडणार?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची पिछेहाट झाली. मिशन ४५ हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महायुतीची वाट बिकट झाली आहे. त्यात पुढील आठवड्यात विधान परिषदेची निवडणूक होत आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्यानं मतदान होईल. १२ जुलैला विधिमंडळात मतदान पार पडेल.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत कालपर्यंत होती. पण कोणीही अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष १२ जुलैकडे लागलं आहे. मतदान गुप्त स्वरुपाचं असल्यानं घोडेबाजाराची शक्यता नाकारता येत नाही. क्रॉस व्होटिंगची शक्यतादेखील आहे. त्यामुळे कोणाची मतं फुटणार याकडे लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असल्यानं परिषदेच्या निवडणुकीतील पराभव मतदारांना ‘मेसेज’ देणारा असेल. त्यामुळे महाविकास आघाडी, महायुतीनं कंबर कसली आहे.
शिंदेसेनेमुळे गणितं बिघडली, ठाकरेसेनेत जाणार भाजपचे पदाधिकारी; डॅमेज कंट्रोलसाठी धावाधाव
विधान परिषदेसाठी भाजपनं ५ जणांना उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखेंना संधी देण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे मैदानात आहेत. तर शिंदेसेनेकडून माजी खासदार भावना गवळी, कृपाल तुमानेंना उतरवण्यात आलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ३ जण रिंगणात आहेत. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, ठाकरेसेनेकडून मिलिंद नार्वेकर, शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर शेकापचे जयंत पाटील निवडणूक लढत आहेत.

विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंनी पाठिंबा द्यावा यासाठी जयंत पाटील आग्रही होते. पण लोकसभा निवडणुकीत रायगड आणि मावळमध्ये शेकापची मदत ठाकरेसेनेच्या उमेदवाराला झाली नसल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी पाटील यांना पाठिंबा दिला नाही. त्यांनी आपले स्वीय सहायक नार्वेकर यांना उमेदवारी दिली. नार्वेकरांचे सर्वच पक्षांमधील नेत्यांशी उत्तम संबंध आहेत. ते अनेकदा दिसून आले आहेत. त्यामुळे नार्वेकर मतांची जुळवाजुळव करु शकतात. जयंत पाटील यांचेही सर्वपक्षीय संबंध चांगले आहेत. त्यामुळे तेदेखील अनेक आमदारांशी संपर्क करत आहेत.
ठाकरे भाजपला हादरा देण्याच्या तयारीत; ६ नगरसेवक, पदाधिकारी पक्ष सोडणार; शिंदेसेनेलाही धक्का
दुसरीकडे महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धोका अधिक आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाची कामगिरी सुमार झाली आहे. त्यानंतर ते महायुतीत एकटे पडल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या गटातील अनेक आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. ते क्रॉस व्होटिंग करु शकतात. लोकसभा निवडणुकीत महायुतीत नाराजी उफाळून आली होती. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानं मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत.

अमरावतीत बच्चू कडू यांनी भाजपच्या उमेदवाराविरोधात त्यांच्या पक्षाकडून उमेदवार दिला होता. कडू यांच्या प्रहार पक्षाचे विधानसभेत २ आमदार आहेत. तर बहुजन विकास आघाडीचे ३ आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पालघरमधून भाजपविरोधात उमेदवार दिला होता. त्यांचे भाजपसोबतचे संबंध ताणले गेले आहेत. याचा फटका महायुतीला बसू शकतो.