भाजप आमदाराकडून सरकारला घरचा आहेर, तर भारतीय संघाचं मायदेशी आगमन; सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. भाजप आमदाराकडून सरकारला घरचा आहेर

सिडको आणि राज्य सरकारमध्ये बिल्डरांचे दलाल, भ्रष्ट अधिकारी बसले आहेत. राज्य सरकारचे अनेक अधिकारी भ्रष्ट आहेत. सरकारमध्येही अनेकांचे हात स्वच्छ नाहीत, अशा शब्दांत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सरकारला घरचा आहेर दिला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला पाच पैशांची किंमत नाही का? तसं असेल तर सांगा. आम्ही लोकांमध्ये गेल्यावर त्यांना हेच सांगू, अशा कठोर शब्दांमध्ये नाईक आपल्याच सरकारवर बरसले. अधिक बातमी सविस्तर वाचा…

२. हैदराबादहून नोंदी मागवल्या

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे’, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या वेळी दिली. मराठा आरक्षण आणि त्यासंबंधीचा प्रश्न आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना देसाई यांनी ही माहिती दिली.

३. ‘लाडक्या बहिणी’ मेटाकुटीस

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी आणि उत्पन्नाच्या दाखल्याबाबतच्या अटी सरकारने शिथिल केल्या असल्या तरी त्याबाबत काही अपप्रवृत्तींकडून दिशाभूल सुरू झाली आहे. सरकारचे नियम कधीही बदलू शकतात. त्यांची काही गॅरंटी नाही, असे सांगत नागरिकांना दाखले काढण्यासाठी प्रवृत्त करीत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा धंदा शहरासह जिल्ह्यात तेजीत सुरू झाला आहे. दाखले व रेशनकार्डाशी संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी बक्कळ पैसे घेणाऱ्या एजंटांनी तहसीलदारांच्या दालनासमोरच दुकाने थाटली असून, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची आर्थिक लूबाडणूक सुरू झाली आहे.

४. ‘लाडक्या बहिणी’कडून मागितली लाच

लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आवश्यक दाखला देण्यासाठी लाच मागणाऱ्या उमरीच्या तलाठ्याला निलंबित करण्यात आले आहे. राजेश शेळके, असे या तलाठ्याचे नाव आहे.

५. ‘जादूटोणाविरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवरही लागू करा’

हाथरसमध्ये भोले बाबा यांच्या सत्संगाचा वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १२१ भाविक मृत्यूमुखी पडले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू झालेला जादूटोणाविरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवरही लागू व्हावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. महाराष्ट्रात लागू झालेला कायदा संसदेत मांडण्याची विनंती महाराष्ट्रातील खासदारांना करण्यात येणार आहे. अंनिसने यासंदर्भात एक पत्रक प्रसृत केले आहे. अधिक बातमी सविस्तर वाचा…

६. आंघोळीसाठी विहिरीवर गेला, अन्…

बारावी पास झाल्यानंतर पुढील प्रवेशासाठी विलंब लागत असल्याने धिरज घराला हातभार लागावा म्हणून शेतात कामाला गेला. खत टाकून झाल्यानंतर आंघोळीसाठी विहिरीवर पाणी काढण्यासाठी बादली टाकली आणि लोखंडी साखळी निसटून तोल गेल्याने अठरा वर्षीय धिरजचा मृत्यू झाला.

७. शाळेचा निष्काळजीपणा, ६ वर्षीय विद्यार्थिनीने गमावला जीव

शाळेतील स्वच्छतागृहात लावलेल्या सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजल मशिन (इन्सिनरेटर)च्या खुल्या तारेचा स्पर्श होऊन सहा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. या घटनेसाठी जबाबदार मुख्याध्यापकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात आले आहे.

८. टीम इंडिया मायदेशी परतली; स्वागतासाठी हॉटेल सजले

टी- २० वर्ल्ड कप २०२४वर भारतीय संघाने आपला हक्क सांगितला. तब्बल १७ वर्षांचा दुष्काळ ही ट्रॉफी जिंकवून संपवला आणि विजेतेपद मिळवले. विश्वविजेता बनल्यानंतर टीम इंडिया मायदेशी कधी परतणार याची उत्सुकता पूर्ण देशाला असताना टीम इंडिया ४ जुलैला भारतात परतणार असे समोर आले होते. आता भारतीय संघ सकाळी सहा वाजता दिल्ली एअरपोर्टवर पोहोचले असून आता हॉटेलमध्ये टीम इंडियाच्या स्वागताची जंगी तयारी सुरु झाली आहे. अधिक बातमी सविस्तर वाचा…

९. पछाडलेला मधल्या वाड्याचा शिवकालीन वारसा

बाबा लगीन… हे शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर येतो तो पछाडलेला सिनेमा. एका पडक्या आणि भयंकर झपाटलेल्या वाड्यात तीन मित्र जातात आणि मग त्यातल्या एकाला त्या वाड्यातली भूत आपलं झाडं बनवतात…. आणि मग सुरु होतो भुतांचा खेळ… २००४ मध्ये रिलीज झालेला सिनेमा सुपरहिट ठरला. किंबहुना आजही प्रेक्षक तो अगदी आवडीने पाहतात. काहींना हा सिनेमा पाहताना आजही थरकाप भरतो. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर अनेकांना हा वाडा खरंच पछाडलेला आहे की काय असा समज झालेला. पण प्रत्यक्षात मात्र या वाड्याला एक शिवकालीन टच आहे.

१०. एअर इंडियाच्या टीम इंडिया विशेष विमानावरून वाद

तब्बल १७ वर्षानंतर टीम इंडिया टी-२० वर्ल्ड कप विजेता म्हणून मायदेशी परतली आहे. बार्बाडोसहून एअर इंडियाच्या चार्टर्ड विमानातून भारतीय संघात दिल्लीत पोहोचला असून आता भारतीय संघाला मायदेशात आणणाऱ्या स्पेशल फ्लाइटवरून वाद निर्माण झाला आहे. देशाच्या हवाई वाहतूक नियामक, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजे DGCA ने एअर इंडियाकडून भारतीय क्रिकेट संघाला बार्बाडोसमधून आणण्यासाठी नियोजित उड्डाण विमान तैनात केल्याच्या अहवालावर एअर इंडियाकडून उत्तर मागितले आहे.