पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर, सर्व मृत तेलंगण राज्यातील

म. टा. वृत्तसेवा, इंदापूर : सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झाले. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज नं. ३ (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. सर्व मृत तेलंगण राज्यातील आहेत. अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले.

पाच जणांना दुर्दैवी मृत्यू

रफिक कुरेशी (वय ३४), इरफान पटेल (वय २४), मेहबूब कुरेशी (वय २४), फिरोज कुरेशी (वय २८) आणि फिरोज कुरेशी (वय २७, सर्व रा. नारायणखेड, तेलंगणा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या पाच जणांची नावे आहेत. सय्यद इस्माइल अमीर (वय २३) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर भिगवणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

फिरण्यासाठी मुंबईत आलेले…

भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगण राज्यातील हे सहा तरुण मुंबईला फिरायला गेले होते. भटकंतीनंतर नारायणखेड या गावी पुणे-सोलापूर महामार्गावरून परतत असताना हा अपघात झाला.

वाहतूक व्यवस्था सुरळीत

अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे, महामार्ग पोलिस उपनिरीक्षक महेश कुरेवाड, सहायक पोलिस उपनिरीक्षक भागवत शिंदे, दत्तात्रय मदने, भानुदास जगदाळे, नितीन जगताप, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्तांना मदत करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली.

अशी घडली घटना

दुपारी सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील ‘डाळज नं. ३’च्या हद्दीत रस्त्यालगत साचलेल्या पाण्याच्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने भरधाव कार खड्ड्यात जोरात आदळली. यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि यात गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी असून भिगवण येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता, की कार तीन-चार वेळा उलटून सेवा रस्त्याजवळील सांडपाणी वाहिनीच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरात धडकली. यात कारचे प्रचंड नुकसान झाले.