MahaRERA: महारेराची ‘ताबा’ तारीखच ग्राह्य; विक्री करारनाम्यात उल्लेख नसलेल्या प्रकरणांसाठी मोठा निर्णय

मुंबई : बांधकाम सुरू असलेल्या निवासी बांधकाम प्रकल्पातील सदनिकेचा ताबा ग्राहकाला देण्याबाबतची तारीख विकासकाने विक्री करारनामा, वितरण पत्र किंवा तत्सम कागदपत्रात नमूद केलेली नसेल तर महारेराच्या वेबसाइटवर नोंदणीच्या वेळी उल्लेख केलेली तारीखच ग्राह्य धरली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय महारेरा प्राधिकरणाने एका प्रकरणाच्या निमित्ताने दिला आहे. त्यामुळे कागदपत्रांत संदिग्धता असल्यास अडचणीत सापडलेल्या अनेक ग्राहकांना या महत्त्वाच्या कायदेशीर स्पष्टतेमुळे आधार मिळू शकतो.‘निर्मल लाइफस्टाइल लिमिटेड’च्या मुलुंडमधील ‘निर्मल लाइफस्टाइल-डिस्कव्हरी’ या प्रकल्पात सदनिका खरेदी करून त्याबाबत सुमारे ६६ लाख ६६ हजार रुपये भरणारे अमृतानंद सालियन यांच्या बाबतीत महारेरा प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय मेहता यांनी सुनावणीअंती नुकताच हा निर्णय दिला. ‘कंपनीने सालियन यांना त्यांनी भरलेले सर्व पैसे १ जुलै २०१७ या तारखेपासून प्रत्यक्षात रक्कम दिली जाईपर्यंतच्या कालावधीसाठी व्याजासह द्यावेत. ६० दिवसांच्या आत ही रक्कम देण्यात यावी’, असे प्राधिकरणाने आपल्या आदेशात म्हटले. सालियन यांनी अॅड. ध्रुमिल शाह यांच्यामार्फत तक्रार दाखल करताना कंपनीकडून भरपाईचीही मागणी केली होती. मात्र, भरपाईच्या प्रश्नावर स्वतंत्र अर्जाद्वारे योग्य त्या मंचासमोर दाद मागण्याची मुभा प्राधिकरणाने त्यांना दिली.

काय होते प्रकरण?

सालियन यांनी सदनिका खरेदीसाठी पैसे भरल्यानंतर त्यांना ४ मार्च २०१२ रोजी सदनिकेचे वितरणपत्र देण्यात आले होते. परंतु, त्यात सदनिकेचा ताबा नेमक्या कोणत्या तारखेला देणार, याचा उल्लेख नव्हता. डिसेंबर-२०१६मध्ये ताबा दिला जाईल, अशी तोंडी ग्वाही त्यांना देण्यात आली होती. परंतु, त्या कालावधीतही प्रकल्प पूर्ण करून ताबा देण्यात आला नसल्याने त्यांनी त्यांचे पैसे सव्याज परत मागितले होते. ‘कंपनीने ताबा देण्याची सुधारित तारीख ३० डिसेंबर २०२३ अशी दिली. मात्र, त्या तारखेलाही ताबा देणे कंपनीला शक्य झाले नसून अद्याप प्रकल्पाला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळालेले नाही’, असे प्राधिकरणाने आदेशात नमूद केले.

…म्हणून प्राधिकरणाकडून ‘ती’ तारीख ग्राह्य

महारेरा कायद्यातील कलम १८ अन्वये, जाहीर केलेल्या तारखेत प्रकल्प पूर्ण करून ग्राहकाला सदनिकेचा ताबा देणे विकासकाला शक्य झाले नाही किंवा विकासकाने प्रकल्प अपूर्ण सोडला, तर त्या परिस्थितीत ग्राहकाने प्रकल्पातून बाहेर पडत पैसे परत करण्याची मागणी केल्यास विकासकाला ते सव्याज देणे बंधनकारक असते. परंतु, या प्रकरणात सालियन यांना कंपनीने दिलेल्या वितरणपत्रात ताबा देण्याची तारीख नमूद नव्हती. त्यानंतर देशभरात रेरा कायदा लागू झाला असताना हा प्रकल्प सुरूच होता. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांनाही महारेराच्या वेबसाइटवर नोंदणी करणे बंधनकारक असल्याने कंपनीने नोंदणी केली. त्यावेळी ताबा देण्याची तारीख नमूद करणेही बंधनकारक असल्याने कंपनीने १ जुलै २०१७ ही तारीख नमूद केली. परिणामी कागदपत्रांतील स्पष्टतेच्या अभावी वेबसाईटवरील तारीखच ग्राह्य धरली जाईल, असा निर्वाळा प्राधिकरणाने दिला.

‘कारणे चालू शकत नाहीत’

‘कलम १८ हे सुस्पष्ट असून त्यात कोणतीही सवलत नाही. त्यामुळे प्रकल्प लांबल्याची कोणतीही व कितीही कारणे विकासकाने दिली तरी ती चालू शकत नाही. प्रकल्प राबवणे किचकट असले तरी त्याची विकासकांना पूर्ण कल्पना असते. त्यामुळे सर्व आवश्यक ती पावले उचलून व सारासार विचार करूनच आपले वचन पाळता येईल, अशी सुस्पष्ट तारीख देणे अपेक्षित आहे. त्याच आधारावर ग्राहक सदनिका खरेदी करत असतो आणि म्हणूनच कायद्यात ते कलम सुस्पष्ट आहे’, अशी कारणमीमांसाही प्राधिकरणाने निर्णयात दिली.