पुण्याला ‘उडता पंजाब’ म्हणू नका, फडणवीसांचं आवाहन, पोर्श प्रकरणात पोलीस आयुक्तांचं कौतुक

मुंबई : पुण्यातील कल्याणी नगर भागात झालेल्या बहुचर्चित पोर्श कार अपघात प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी तोडपाणी झाल्याचा गंभीर आरोप करत सभागृह दणाणून सोडले. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांचं कौतुक करत कारवाईविषयी माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“पुणे ही आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, ते विद्येचं माहेरघर म्हणूनही ओळखलं जातं, तसंच टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चर हबही झालं आहे. इथे देशभरातून गुंतवणूक होते. मला वाटतं की पुण्याचा ‘उडता पंजाब’ झाला म्हणून त्याची बदनामी करणं योग्य नाही. कारण
देशभरात बदनामी होते. घडलेल्या घटनांचं गांभीर्य मी नाकारत नाही, पुण्याचा ‘उडता पंजाब’ झाला म्हणू नका” असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

माझ्या मित्राला खोटं बोलण्याची सवय नको

याविषयी नाना पटोले यांनी वृत्तपत्रांतील बातम्यांकडे लक्ष वेधलं असता, “नानाभाऊ, हे रोज नरेटिव्ह सेट करण्याची पद्धत आहे, त्यातून खोटं बोलण्याची सवय लागेल. माझ्या मित्राला खोटं बोलण्याची सवय लागू देऊ नका. रोज आपलं खोटं बोला, रेटून बोला योग्य नाही…” असं फडणवीस म्हणाले.
Vijay Wadettiwar : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांची निदर्शनं; ‘शेठ ही आमची जागा’ वडेट्टीवारांची गोगावलेंना कोपरखळी

पुणे पोलीस आयुक्तांचं कौतुक

“या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांनी प्रोअॅक्टिव्ह (तडफदार) भूमिका घेतली, त्यात तसूभरही त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता मला वाटत नाही. अलिकडची एक पद्धत सुरु झाली आहे, की कोणीतरी कागद आणतं आणि म्हणतं की हे बघा रेटकार्ड, हे आजचे रेट सुरु आहेत. पण असं नसतं. या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. विरोधीपक्ष नेत्यांनी दिलेल्या माहितीची चौकशी केली जाईल. त्यांनी गाडीचं रजिस्ट्रेशन केलं, पण प्रोसेस पूर्ण केली नाही, टॅक्स भरला नाही. त्यानुसार कारवाई केली आहे. कलम ४२०, ४६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यात आरटीओ अधिकाऱ्यांचं काही संगनमत आहे का, हेही तपासून बघू” असं आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिलं.