RMC प्रकल्पांमुळे श्वास घेणे अवघड; मालवाहतूक बेततेय जीवावर, वर्षभरात ४५ जणांचा चिरडून मृत्यू

प्रतिनिधी, पुणे : बांधकामांसाठी लागणारे ‘रेडी मिक्स काँक्रिट’ (आरएमसी) तयार करणाऱ्या प्रकल्पांतील धुळीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून, श्वासही घेणे अवघड झाले आहे, असा संताप नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील सोसायट्यांमधील रहिवाशांनी व्यक्त केला. या प्रकल्पांवरून मालाची ने-आण करणाऱ्या ट्रकच्या बेशिस्त वाहतुकीमुळे नागरिक जीव मुठीत धरून राहात आहे. गेल्या वर्षभरात ४५ जणांचा चिरडून मृत्यू झाला असून, ११० जण जखमी झाले आहेत, असा गंभीर आरोपही या वेळी करण्यात आला.

सरकारी नियमांची पायमल्ली करून बेकायदा सुरू असलेले ‘रेडी मिक्स काँक्रिट’ प्रकल्प बंद करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी प्रयेजा सिटीसह परिसरातील सोसायट्यांमधील नागरिकांनी या प्रकल्पांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला.

‘बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी राज्यकर्ते आणि प्रशासनाच्या वरदहस्तातून शहरात ‘आरएमसी प्रकल्प माफिया’ फोफावले आहेत. अनेक प्रकल्प राज्य सरकारचे अध्यादेश आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला केराची टोपली दाखवून मनमानीपणे कार्यरत आहेत. या प्रकल्पांतून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा फटका आसपासच्या रहिवाशांना बसत असून, श्वसन विकारांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकल्पातून मालवाहतूक करणाऱ्या अनेक ट्रकचे पासिंग झालेले नाही, अनेक ट्रकचालकांकडे वाहन परवाना नसून, ते मद्य प्राशन करून वाहतूक करतात. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केल्यास केवळ नोटीस बजावली जाते, परंतु कारवाई केली जात नाही. त्यामुळे बेकायदा सुरू असलेले ‘आरएमसी’ प्रकल्प तातडीने बंद करावे, या प्रकल्पांच्या ट्रकची ‘आरटीओ’ने तपासणी करावी, तसेच परिसरात वाहतूक पोलिस नियुक्त करावा,’ अशी मागणी संभूस यांनी केली.
धंदा जोमात, सरकार कोमात! तिजोरीला हजारो कोटींचा फटका, पुण्यातील दगड खाणींचे होणार सर्वेक्षण
प्रकल्पातून मालवाहतूक करणारे ट्रक भरधाव धावत असतात. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे कुटुंबीय सुखरुप परत येईपर्यंत चिंता वाटते.– शीतल पेंडसे

नियमांचे उल्लंघन करून प्रकल्प कार्यान्वित असून, त्यातून होणाऱ्या मालवाहतुकीमुळे नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. याबाबत तक्रार करूनही कार्यवाही होत नाही.– लोकेश भावेकर

सोसायटीच्या जवळ असलेल्या रेडी मिक्स काँक्रिट प्रकल्पातून उडणाऱ्या धुळीमुळे घरातील नागरिक व मुलांना सर्दी-खोकल्याचे विकार होत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने घरात मास्क घालून राहावे लागते.– गायत्री भालेराव