ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा फेस, राऊतांच्या हालचालींवर काँग्रेस-राष्ट्रवादीत चलबिचल, वडेट्टीवार म्हणतात…

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विश्वास आता वाढला आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. त्यात आता या सरकारचे शेवटचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात मविआने सरकारला घेरण्यासाठी चांगलंच कंबर कसलं आहे. याचदरम्यान, खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, ”विधानसभा निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे मविआचे मित्रपक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरुन आघाडीत बिघाडी होते का काय? याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

खासदार संजय राऊत काय म्हणाले?

मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला समोरे जाणे धोक्याचे आहे. महाविकास आघाडीला जे लोकसभेला यश मिळाले ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामुळेच मिळाले असं संजय राऊत यांनी सांगितले. बिन चेहऱ्याचे सरकार अजिबात चालणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे मविआने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषीत करावे, अशी मागणी, संजय राऊत यांनी केली आहे.
Chandrakant Patil : अजितदादांवर चिडून कॅबिनेट बैठकीतून काढता पाय? चंद्रकांत पाटील म्हणतात अर्थ विभागाने म्हणे…

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची प्रतिक्रिया?

संजय राऊत यांच्या या मागणीचे पडसाद लगेचच महाविकास आघाडीत उमटले. राष्ट्रावादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबात आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ”महायुतीला हरवणं हे आमचं पहिलं टार्गेट आहे. महायुतीला सत्तेवरुन खाली उतरवू. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री कोण असेल हे आम्ही बसून ठरवू”, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. तर ”मविआची एकत्रित बैठक होईल. या बैठकीत मुख्यमंत्री कोण असणार? हे ठरवलं जाईल”, असं विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याला काँग्रेस राष्ट्रवादीने एक प्रकारे विरोध केला आहे असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही.

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार काय म्हणाले?

संजय राऊत यांच्या या मागणीनंतर शिवसेनेचे आमदारही आक्रमक झाले आहेत. आमदार वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री म्हटलं आहे. ”त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूका लढवल्या जातील. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ठाकरे असतील”, असंही नाईक यांनी स्पष्ट केलं. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ”सध्या मुख्यमंत्री कोण हा विषय महत्त्वाचा नाही असं सांगितलं. शिवाय याबाबतचा निर्णय मविआच्या बैठकीत घेतला जाईल”, अशी सावध भूमीका घेतली आहे.