खडसे शहांच्या भेटीला, जोरदार कमबॅकची तयारी; लवकरच मोठी जबाबदारी? फडणवीसांना धक्का?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा धक्का बसला. मिशन ४५ हाती घेतलेल्या महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीत २३ जागा जिंकणारा भाजप यंदा थेट ९ जागांवर आला. मराठवाड्यात पक्षाला भोपळा मिळाला. विदर्भात अवघ्या २ जागांवर समाधान मानावं लागलं. यानंतर राज्य भाजपचे महत्त्वाचे नेते दिल्लीला गेले. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहांनी या बैठकीत राज्य भाजपच्या नेत्यांची बरीच कानउघाडणी केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय नेतृत्त्वानं भाजपच्या राज्य नेतृत्त्वाची कानउघाडणी केली. कोअर कमिटीच्या बैठका का होत नाहीत, असा प्रश्न केंद्रीय नेतृत्त्वाकडून विचारण्यात आला. निर्णय घेताना कोअर कमिटीत चर्चा करा. कोअर कमिटीच्या वतीनं निर्णय घेऊ नका. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, अशा शब्दांत नेतृत्त्वानं राज्यातील नेत्यांचे कान टोचले.
कोअर कमिटीच्या मीटिंग का होत नाहीत? नेतृत्त्वाकडून राज्यातील भाजप नेत्यांची कानउघाडणी
राज्य भाजपच्या कामगिरीबद्दल केंद्रीय नेतृत्त्व नाराज आहे. त्यामुळे राज्य भाजपमध्ये लवकरच फेरबदल होऊ शकतात. राज्यात भाजप वाढवण्यात भूमिका बजावणारे आणि फडणवीसांवर आरोप करत पक्ष सोडणारे एकनाथ खडसे लवकरच पक्षात सक्रिय होऊ शकतात. त्यांचा पक्षप्रवेश करुन त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसेंना केंद्रात राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. एकनाथ खडसेंनी रक्षा यांच्यासह दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली. त्यानंतर खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात सुरु झाली आहे.
लोकसभेत फटका, विधानसभेपूर्वी धडाका; महायुती गेमचेंजर योजना आणण्याच्या तयारीत; लवकरच घोषणा
रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना केंद्रात क्रीडा विभागाचं राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. केंद्रीय नेतृत्त्व राज्य भाजपाच्या कामगिरीवर असमाधानी आहे. त्यामुळे विधानसभेआधी एकनाथ खडसेंना पक्षात सक्रिय करण्यात येणार असल्याची सुत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात खडसेंना स्थान देण्यात येऊ शकतं. त्यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. सध्या हे खातं देवेंद्र फडणवीसांकडे आहे. विधानसभा निवडणुकीतही फडणवीसच पक्षाचा चेहरा राहिल्यास भाजपला त्याचा फटका बसेल, असा पक्षाचा कयास आहे. गृह मंत्रालयाची जबाबदारी न दिली गेल्यास खडसेंकडे प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकतं. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा कार्यकाळ २०२५ मध्ये संपणार आहे.

राज्यात फडणवीस सरकार असताना ३ जून २०१६ रोजी खडसेंना मंत्रिपद सोडावं लागलं होतं. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पक्षात त्यांना साईडलाईन करण्यात आलं. ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. शरद पवारांनी रावेरमधून खडसेंना तिकीट देण्याची तयारी केली होती. पण त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला. आपण १५ दिवसांत भाजपमध्ये परतू, असं खडसे ७ एप्रिलला म्हणाले होते. पण त्यांचा पक्षप्रवेश रखडला. आता लोकसभा निवडणुकीत भाजपची राज्यात झालेली वाताहत पाहता खडसेंना लवकरच नवी जबाबदारी मिळू शकते.