अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रातील 10 जणांचा मृत्यू
अहमदाबामध्ये गुरूवारी दुपारी एअर इंडियाचं विमान क्रॅश होऊन भीषण अपघात झाला. त्यामध्ये एकूण 265 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विमानात एकूण 242 प्रवासी होते, त्यापैकी अवघा एक माणूस जीवानिशी वाचला. मात्र इतर सर्व प्रवासी, क्रू मेंबर्स, पायलट तसेच विमान ज्या वसतीगृहाच्या इमारतील धडकले तेथील शिकाऊ डॉक्टर्स यांच्यासह 265 जण मृत्यूमुखी पडले. देशाच्या इतिहासातील अतिशय भीषण अशा या अपघातामुळे फक्त भारतच नव्हे तर अख्खं जग हादरलं आहे.
एअर इंडियाच्या या विमानाने टेकऑफ केल्यानंतर अवघ्या 12 ते 15 सेकंदांत ही दुर्घटना घडली आणि ते विमान मेघानी परिसरात असलेल्या मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहाला धडकून खाली कोसळलं आणि आगीचा एकच लोळ उठला. काही क्षणातंच होत्याचं नव्हतं झालं. अहमदाबादहून गुरूवारी दुपारी 1 वाजून 38 मिनिटांन निघालेल्या या फ्लाईटमध्ये 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यांपैकी 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते.
काल दुपारी विमानाने टेक ऑफ केल्यानंतर ते आवश्यक उंचीवर जात नाहीये हे वैमानिक सुमीत सभरवाल यांच्या लक्षात आलं, त्यांनी लगेचच ‘मे-डे कॉल’ अर्थात विमान संकटात आहे संदेश पाठवला. पण त्यांना कोणतीही मदत मिळण्यापूर्वीच विमान खाली कोसळलं आणि सगळा खेळ संपला.
महाराष्ट्रातील 10 जणांचा मृत्यू
दरम्यान या अपघातातील मृतांमध्ये 10 जणांचा समावेश आहे. मृतांमध्ये मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह सहा क्रू मेंबर्स तसेच चार प्रवाशांचा समावेश आहे. वैमानिक सुमीत सभरवाल (मुंबई, पवई), दीपक पाठक (बदलापूर), मैथिली पाटील (न्हावा गाव, पनवेल), रोशनी सोनघरे (डोंबिवली), अपर्णा महाडिक (गोरेगाव), आणि साईनीता चक्रवर्ती (जुहू) आशा पवार आणि महादेव पवार दाम्पत्य हे पंढरपूरचे रहिवासी असल्याचे समजते. तसेच मयुर पाटील याचाही मृत्यू झाला असून त्यांच्यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकलेले नाही. नागपूरच्या असलेल्या यशा कामदार, त्यांचा मुलगा आणि सासू यांचाही मृत्यू झाल्याचे समजते. अहमदाबाद विमान अपघाताची माहिती कळताच काल दुपारी 3 वाजता कामदार कुटुंबीय अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले
दीपक पाठक यांचा आईला शेवटचा कॉल
एअर इंडियात 11 वर्षांपासून कार्यरत असलेले दीपक पाटील हे बदलापूरचे रहिवासी असून कालच्या अपघातात त्यांचाही मृत्यू झाला. काल विमानाने टेकऑफ करण्यापूर्वी सकाळी दीपक यांनी आईला फोन करून विचारपूस करत गप्पा मारल्या होत्या, मात्र तेच त्यांचं शेवटचं बोलणं ठरलं. त्यांचे कुटुंबीय धक्क्यात असले तरी सतत त्यांचा फोन ट्राय करत आहेत. जोपर्यंत फोन वाजत राहील, आम्हाला या बातमीवर विश्वास बसणार नाही, असं कुटुंबियांनी सांगितलं.