दिवा-मुंब्रा स्थानका दरम्यान 8 प्रवाशांचा मृत्यू, घटनेला जबाबदार कोण? मोठी अपडेट समोर

दिवा मुंब्रा स्थानका दरम्यान 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मृत्यू झालेले 8 प्रवासी कसारा – सीएसएमटी लोकलमधील होते. लोकलला लटकलेले प्रवासी एक्स्प्रेसला घासले आणि त्याच्या मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून 8 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. घटना घडल्यनंतर घटनेला जबाबदार कोण, रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

मध्ये रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पाच प्रवासी पुष्पक एक्स्प्रेममधून पडले आहेत. मुंब्रा स्थानकाजवळ घटना घडली आहे. कसाऱ्याला जाणारी गाडी होती. दिवा आणि मुंब्रा स्थानका दरम्यान आता रुग्णवाहिकेची व्यवस्था केली जात आहे. रुग्णवाहिका पोहोचल्यानंतर आणि उपचार झाल्यानंतर प्रवाशांच्या प्रकृतीची माहिती कळू शकेल. प्रवासी पुष्पकमधून पडले आहेत की दुसऱ्या कोणत्या गाडीतून पडले आहेत याबद्दल अधिकृत माहिती सध्या समोर आलेली नाही. कसारा आणि पुष्पक या दोन्ही गाड्या बाजू-बाजूने जात असल्यामुळे प्रवाशी कोणत्या गाडीतून पडले अद्याप कळू शकलेलं नाही.’

घडलेल्या घटनेवर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.’घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. घडलेल्या घटनेचा तपास करणं गरजेचं आहे. पुष्पक एक्स्प्रेसमधील घटना आहे. त्यामुळे चौकशीमध्ये नक्की कारण समजेल. त्यामुळे आता अंदाज व्यक्त करणं योग्य नाही. प्रशासनाच्या काही त्रुटी असतील तर कारवाई होईल. रुग्णसेवा देखील लवकरच घटना स्थळी पोहचेल…’ असं संजय केळकर म्हणाले.

मनसे नेते अविनाश जाधव यांनी देखील घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिला आहे. ‘दिवा – मुंब्रा मार्गावर अशा घटना कायम घडत असतात. त्यामुळे प्रशासनाने ज्या योजना आणि काळजी घेतली पाहिजे, ते याठिकाणी दिसून येत नाही. खरंतर हा मार्ग संपूर्ण देशाच्या मार्गाला सांभाळणारा मार्ग आहे आणि याच मार्गावर सतत घटना घडत असतील प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे.’ या घटनेसाठी जबाबदार कोण? यावर अविनाश जाधव म्हणाले, ‘प्रशासन आणि त्या भागातील नेते घटनेला जबाबदार आहेत. कारण तुम्ही खासदार, आमदार आहात आणि तुम्हाला आपल्या भागामध्ये कोणत्या गोष्टीची गरज आहे किंवा आपल्या भागातील लोकांच्या सुरक्षेसाठी काय करायला हवं कळलं पाहिजे…’ असं देखील अविनाश जाधव म्हणाले.

मध्ये रेल्वेकडून मोठी अपडेट

ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर सीएसएमटीकडे जाणारे काही प्रवासी ट्रेनमधून पडले. ट्रेनमध्ये अधिक गर्दी असल्यामुळे प्रवासी पडले असं सांगण्यात येत आहे. रेल्वे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. अपघाताची चौकशी सुरू असून घटनेमुळे स्थानिक सेवांवरही परिणाम झाला आहे… अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)