‘भारत गौरव ट्रेन’ मुंबईहून रवाना; छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचं दर्शन, अशी असेल 6 दिवसांची ट्रिप

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन गौरवाची माहिती देण्यासाठी राज्य शासनाने पर्यटन महामंडळ आणि भारतीय रेल्वे खानपान महामंडळ (आयआरसीटीसी) यांच्यातर्फे आज सोमवारपासून ‘भारत गौरव पर्यटन रेल्वेगाडी’ धावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी सहा वाजता या विशेष पर्यटन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक उपस्थित होते. पर्यटन विभागाच्या पुढाकाराने छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक स्थळांना पाच दिवसांत भेट दिली जाणार आहे. मध्य रेल्वेनं सांगितलं की या ट्रेनला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आज निघालेल्या या ट्रेनच्या सर्व जागा भरल्या होत्या.

या दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी आणि वारशाशी संबंधित अनेक प्रतिष्ठित ठिकाणं पाहिली जातील. यामुळे पर्यटकांना मराठा इतिहास आणि संस्कृती यांचा अनोखा अनुभव मिळेल. “या सहलीत एकूण 710 प्रवासी असून त्यापैकी 480 स्लीपर क्लासमध्ये, 190 कम्फर्ट क्लासमध्ये (3AC) आणि 40 सुपीरिअर क्लासमध्ये (2AC) आहेत. पहिल्या दिवशी ही ट्रेन माणगाव रेल्वे स्थानकावर पोहोचेल”, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली.

6 दिवसांचा हा दौरा कसा असेल?

पहिला दिवस- रायगड किल्ला, पुण्यात रात्रीचं जेवण आणि मुक्काम
दुसरा दिवस- लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी, पुण्यात रात्री मुक्काम
तिसरा दिवस- शिवनेरी, भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर, पुण्यात मुक्काम
चौथा दिवस- साताऱ्यातील प्रतापगड किल्ला
पाचवा दिवस- महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा किल्ला
सहावा दिवस- मुंबईत आगमन

सहलीचा संपूर्ण प्रवास कार्यक्रम

या ट्रिपमध्ये रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, प्रतापगड किल्ला, पन्हाळा किल्ला, लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी यांसारखे ऐतिहासिक स्थळ पहायला मिळतील. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या पैलूंचं चित्रण करतात. त्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर यांचा अतिरिक्त समावेश करण्यात आला आहे.

  1. या सहा दिवसांच्या सहलीबद्दल सविस्तरपणे सांगायचं झालं तर, पहिल्या दिवशी ही ट्रेन कोकण रेल्वे नेटवर्कवरील माणगाव रेल्वे स्थानकावर पोहोचेल, जे रायगड किल्ल्यापासून सर्वांत जवळचं रेल्वे लिंक आहे. भेट देण्याचं पहिलं ठिकाण हे रायगडच आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. प्रेक्षणीय स्थळांना भेट दिल्यानंतर पर्यटक पुन्हा ट्रेनमध्ये परततील आणि पुढच्या ठिकाणी जातील. पुण्यात पर्यटक जेवण करतील आणि तिथल्याच एका हॉटेलमध्ये त्यांचा रात्रीचा मुक्काम असेल.
  2. सहलीच्या दुसऱ्या दिवशी पर्यटक पुण्यातील लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टीला भेट देतील. लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचं वर्णन करणाऱ्या तैलचित्रांचा एक मोठा संग्रह आहे. तर कसबा गणपतीचं मंदिर 1893 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाईंनी बांधलं असं मानलं जातं. दुसऱ्या दिवसाच्या उत्तरार्धात पर्यटक शिवसृष्टीला भेट देतील, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आख्यायिकेचं प्रदर्शन करणारं सर्वांत मोठं ऐतिहासिक थीम पार्क आहे.
  3. पुण्यात रात्रीच्या विश्रांतीनंतर तिसऱ्या दिवशी पाहुणे शिवनेरीला भेट देतील. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान, मराठा अभिमानाचं आणि मुस्लिम राजवटीविरुद्धच्या प्रतिकाराचं प्रतीक आहे. जेवणानंतर पर्यटक 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट देतील आणि नंतर रात्रीच्या मुक्कामासाठी पुण्यात परततील.
  4. प्रवासाच्या चौथ्या दिवशी पर्यटक साताऱ्यातील पुढील प्रवासासाठी ट्रेनने रवाना होतील. तिथलं प्रमुख आकर्षण म्हणजे प्रतापगड किल्ला. 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि विजापूर सल्तनतचा सेनापती अफजल खान यांच्यात झालेल्या युद्धामुळे या किल्ल्याला प्रचंड ऐतिहासिक महत्त्व आहे. या युद्धाने मराठा साम्राज्याच्या स्थापनेचा पाया रचला होता.
  5. यानंतर पर्यटक ट्रेनने कोल्हापूरला जातील. हॉटेलमध्ये स्नान आणि नाश्ता केल्यानंतर महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेतील. त्यानंतर ते पन्हाळा किल्ल्यावर जातील. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या डोंगरी किल्ल्याने अनेक युद्धे पाहिली आहेत.
  6. संध्याकाळी उशिरा ही ट्रेन मुंबईसाठी परत निघते आणि सहाव्या दिवशी सकाळी मुंबईला पोहोचते. या सहलीत रेल्वे प्रवास, आरामदायी हॉटेलमध्ये रात्रीचा मुक्काम, सर्व जेवण (फक्त शाकाहारी), बसमधील प्रवास आणि प्रेक्षणीय स्थळांची पाहणी, प्रवास विमा, टूर एस्कॉर्ट सेवा इत्यादींचा समावेश असेल.
(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)