Chandrakant Vaidya : गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि शिवसेना- ठाकरे गट यांच्या युतीची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या भावांमध्ये समेट घडून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता ठाकरे बंधूंचे मामा असलेले चंद्रकांत वैद्य यांनी मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी यावेळी दोन्ही भावांची युती शक्य वाटत असल्याचं म्हटलंय.
चंद्रकांत वैद्य नेमकं काय म्हणाले?
चंद्रकांत वैद्य हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा आहेत. त्यांनी टीव्ही 9 मराठीला बोलताना या दोन्ही भावांच्या युतीवर भाष्य केलंय. तसेच यावेळी खासदार संजय राऊत हे दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून दोघांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न केले होते. यावेळेस वातावरण चांगलं आहे. दोघेही सकारात्मक आहेत असं वाटतंय. खासकरून यावेळी दोघांच्याही मनोमिलनासाठी संजय राऊत प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हे शक्य वाटतंय, असं मत चंद्रकांत वैद्य यांनी व्यक्त केलंय. तसेच राऊतांच्या मागे स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद आहे, ते अनेक अशक्य गोष्टी शक्य करतात, असे कौतुकही चंद्रकांत वैद्य यांनी केले आहे.
भविष्यात नक्कीच काहीतरी चांगलं होईल
दोघेही सकारात्मक असल्याने निर्णय लवकर होईल अशी अपेक्षा आहे. आई तुळजाभवानीचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे त्यांनी एकत्र यावे असे वाटतेय. आमचे अनेक नातेवाईक आमच्या संपर्कात आहेत. पण मी आता याविषयावर त्यांच्याशी बोललेलो नाही. ब्लड इज थिकर दॅन वॉटर, म्हणत भविष्यात नक्कीच काहीतरी चांगलं होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सगळ्याच नातेवाईकांची जशी इच्छा…
दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी त्यांचे नातेवाईक प्रयत्न करत आहेत, असं म्हटलं जात होतं. यावरही चंद्रकांत वैद्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मला कल्पना नाहीच. सगळ्याच नातेवाईकांची जशी इच्छा असते तशी माझीही त्यांनी एकत्र यावे अशी इच्छा आहे. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, याबाबत मला कल्पना नाही, असं चंद्रकांत वैद्य यांनी सांगितलंय.