राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचा दावा केला जात आहे. शिवसेना उबाठा नेते संजय राऊत रोखठोकपणे ही भूमिका मांडत आहेत. त्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून अप्रत्यक्ष दुजोरा दिला जात आहे. या घटनांचा पार्श्वभूमीवर मातोश्रीवर रविवारी महत्वाची बैठक सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित होत असलेल्या या बैठकीसाठी महत्वाचे नेते दाखल झाले आहेत.
मातोश्रीवर शिवसेना उबाठा नेत्यांची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीसाठी संजय राऊत, विनायक राऊत इतर नेते मंडळी दाखल झाली आहे. मुंबईतील निरीक्षक आणि उपनेत्यांनाही या बैठकीला बोलवले आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीत निरीक्षकांना संपूर्ण मुंबई मनपा निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्याचे सांगितले होते. त्यासंदर्भातील अहवाल निरीक्षक बैठकीत मांडणार आहे. त्यामुळे मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता आहे.
राज ठाकरे यांच्याकडून सुरुवात
ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा राज ठाकरे यांनी सुरु केली. महेश मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची मुलाखती घेतली होती. या मुलाखतीमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारला होता. त्याला सकारात्मक उत्तर राज ठाकरे यांनी दिले होते. ते म्हणाले होते की, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी वाद ही शुल्लक गोष्ट आहे. त्यामुळे एकत्र येणे यामध्ये मला कठीण गोष्ट वाटत नाही, असे राज म्हणाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ऑफर स्वीकारण्यास होकार देत भाजप आणि शिवसेनेची साथ सोडण्याची अट टाकली होती.
उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिवसेना उबाठाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटोही प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना हसत हसत मातोश्रीवर जात असल्याचे म्हटले. पुढच्या क्षणात कौटुंबिक कामासाठी बहिणीकडे जात असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा सुरुच आहे.