Gajanan Kirtikar : शिवसेना एकसंघ का होत नाही? गजानन कीर्तिकर म्हणाले, या मागे अदृश्य शक्ती

गजानन कीर्तिकरांचे मोठे वक्तव्यImage Credit source: गुगल

शिवसेनेतील ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी मनसे, उद्धव सेना आणि एकनाथ शिंदे सेना मिळून सर्व पक्ष विरहित एकच शुद्ध शिवसेनेचा पुकारा केला आहे. त्यांच्या या विचाराने कार्यकर्त्यांच्या मनात एकसंघ शिवसेनेचा हुंकार भरला आहे. टीव्ही 9 मराठी शी बोलताना शिवसेना एकसंघ होऊ नये यामागे कोण आहे, यावर ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी मोठे भाष्य केले आहे. कोणत्या छुप्या शक्ती शिवसेनेला एकसंघ होऊ देत नाही, यावर त्यांनी मोठे भाष्य केले आहे.

जनाधार नसला तरी कॅडर कायम

राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही इच्छा राज्यातील सर्व शिवसैनिकांची आहे. बाळासाहेबांचीही होती. दोन्ही बंधू त्यांच्याकडे कॅडर आहे, फक्त एवढंच आहे की त्यांचा जनाधार तेवढा राहिला नाही. बाळासाहेबांच्या वेळेला जो जनाधार होता तो आता राहिला नाही. पण कॅडर आहे. आणि बाळासाहेबांच्या पासून शिवसेनेत नेतृत्व करणारे हे आमचे दोन युवा नेते. त्यांनी एकत्र यावं ही केवळ माझीच नाही तर महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांची इच्छा आंकाक्षा आहे. आम्ही केवळ इच्छाच व्यक्त करतो. त्यांनी एकत्र यावं. शिवसेनेचं जे विभाजन झालं. शिंदे एका बाजूला उद्धव ठाकरे दुसऱ्या बाजूला. त्यामुळे शिवसेनेचं खूप मोठं नुकसान झालं. आज दोन बंधू एकत्र येणं गरजेचं आहेच. पण त्याचबरोबर बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. तेही या युतीत आले पाहिजे. आणि बाळासाहेबांच्या वेळची शिवसेना तयार झाली पाहिजे ही आमची मनोमन इच्छा आहे, असे मोठे वक्तव्य गजानन कीर्तिकर यांनी केले.

तरच ठाकरे ब्रँड टिकेल

दोन बंधू एकत्र आले तर ठाकरे ब्रँड टिकेल. शिवसेनेचं विभाजन झालं. त्याचा गैरफायदा राजकारणात घेतला गेला. त्यासाठी ठाकरे ब्रँड पुन्हा आवतरला पाहिजे. अजूनही जुने शिवसैनिक आहेत. दोन ठाकरे एकत्र आले तर त्यांच्या मागे राज्यातील शिवसैनिक उभे राहतील, असे कीर्तिकर म्हणाले.

काँग्रेसची साथ उद्धव ठाकरेंनी सोडायलाच हवी. आणि राज ठाकरे भाजपसोबत गेलेच नाही कधी. भाजप विरहित, काँग्रेस विरहित शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे. तेवढे ते हुशार आहे. महाराष्ट्रातील जनतेमध्ये, कार्यकर्त्यांच्या मनात काय भावना आहे हे त्यांना माहीत आहे.

एकत्र आल्यावर त्यांचं कॅडर काय ठरवतं. मतदारांना तर दोघे एकत्र यावं. दोघांनी येऊन शिवसेना अभेद्य होणार नाही. एकनाथ शिंदे यांचीही शिवसेना एकत्र आली पाहिजे. ही शिवसेना असेल ती महाराष्ट्रातील निवडणुकीत मग लोकसभा असो किंवा विधानसभा असो यात ती सिकंदर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ती अदृश्य शक्ती तरी कोणती?

शिवसेना एकसंघ होऊ नये यासाठी अदृश्य शक्ती मिठाचा खडा टाकत असल्याचे कीर्तिकर म्हणाले. मी त्यांचं नाव घेत नाही. शिवसेना एकसंघ व्हावी, म्हणजे भविष्यात आपल्याला धोका आहे. हा धोका ज्यांना वाटतो ते मिठाचा खडा टाकतात. मी त्यांचं नाव घेत नाही आता. अदृश्य आहे. मी आज नाव घेत नाही. अदृश्य शक्ती आहे. त्यांचे मनसुबे आहेत. पूर्ण ताकदीने आपण सत्तेत असावं. जेव्हा शिवसेना विभाजित राहिली तरच ते शक्य होईल. त्यामुळे शिवसेना एकत्र येऊ नये असे मनसुबे असणारच काही लोकांचे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)