माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली असतानाच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे हे मतलबी स्वभावाचे असल्याचं सांगतानाच उद्धव ठाकरे हे कधीच ठाकरे ब्रँड होऊ शकत नाहीत, असा दावाच रामदास कदम यांनी केला आहे. तसेच शिवसेना सोडताना मातोश्रीत काय घडलं होतं? उद्धव ठाकरे यांना काय सल्ला दिला होता? याचा गौप्यस्फोटही रामदास कदम यांनी केला आहे.
शिवसेना नेते रामदास कदम यांनी टीव्ही9 मराठीशी एक्सक्लुसिव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे हे फक्त बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. बाळासाहेबांची वैचारिक भूमिका त्यांच्याकडे नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी बाळासाहेबांच्या भूमिकेला हरताळ फासण्याचं काम, पायमल्ली करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलंय. काँग्रेससोबत जाऊन त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची पायमल्ली केली. ते जगाने पाहिलं. त्यामुळे उद्धव ठाकरे कधीच बाळासाहेबांचा ब्रँड होऊ शकत नाही. ज्या काँग्रेससोबत बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्या काँग्रेससोबत जाण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं, असं रामदास कदम म्हणाले.
असं सांगून मातोश्रीतून बाहेर पडलो
मी ज्या दिवशी मातोश्रीतून बाहेर पडलो. तेव्हा उद्धव ठाकरेंना थेट सांगितलं होतं. उद्धवजी, काँग्रेस सोबत जाऊन मुख्यमंत्री होणार असाल तर बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. बाळासाहेबांचा आत्मा तडफडेल. उद्धव जी ही भूमिका घेऊ नका. हे सांगून मी मातोश्रीतून बाहेर पडलो. त्यानंतर मी मातोश्रीत परत गेलो नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हा बाळासाहेबांचा ब्रँड होऊच शकत नाही. मुलगा म्हणून ठिक आहे. एक नालायक मुलगा निघाला असेल, बाळासाहेबांच्या विचारांची पायमल्ली करत असेल तर तो ब्रँड कसा होऊ शकतो? आम्हाला वेदना होत आहेत, असा हल्लाच कदम यांनी चढवला.
असा व्यक्ती ब्रँड होऊ शकतो?
कदाचित राज ठाकरेंचा ठाकरे हे ठाकरे ब्रँड होऊ शकतात. उद्धव ठाकरे होऊ शकत नाहीत. मी जबाबदारीने बोलतो. बाकीचे आमदार गुवाहाटीला गेले होते. तेव्हा गुलाबराव पाटील 20 आमदारांना घेऊन मातोश्रीत बसले होते. उद्धवजी अजून तुम्हाला विनंती आहे, आपण काँग्रेससोबत जाऊ नका, अशी विनंती गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना केली. हवं तर गुलाबराव पाटलांना विचारा. त्यावर उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटलांना गेट आऊट म्हटलं. गेट आऊट. तुम्हीही चालते व्हा, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आपल्या सहकाऱ्यांना अशी भाषा वापरणारा व्यक्ती हा ठाकरे ब्रँड होऊ शकतो का? कदाचित राज आणि उद्धवचं मनोमिलन झालं तरी उद्धव ठाकरे हा ठाकरे ब्रँड होऊच शकत नाही. आम्ही पक्ष मोठा केला. आम्ही जेलमध्ये जात होतो, तेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफी करत होते. बाळासाहेबांचा ब्रँड काय आहे हे आम्हाला सांगायची गरज नाही, असं ते म्हणाले.
नेते संपवा… एक कलमी कार्यक्रम
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिला कार्यक्रम हाती घेतला, तो म्हणजे बाळासाहेबांसोबत जे जे नेते होते, त्या सर्वांना संपववायचा. नेते संपवण्याचा एक कलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. मनोहर जोशींना शिवाजी पार्कच्या व्यासपीठावरून खाली जायला सांगितलं. मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पायाला हात लावत होते. पण उद्धव ठाकरेंना दया आली नाही. त्यांनी जोशींना जायला लावलं. प्रमोद नवलकरांना शेवटपर्यंत भेटले नाही. नवलकर गेल्यावर त्यांच्या मुलीला भेटायला उद्धव ठाकरे गेले होते. तेव्हा तुम्ही आता इथे कशाला आला? चालते व्हा… असं नवलकरांची मुलगी म्हणाली होती. नवलकरांची मुलगी अजून जिवंत आहे, तिला विचारू शकता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर लिलाधर डाकेंसारखा ज्येष्ठ नेता त्यांना भेटायला गेला. त्यांना पाच तास वर्षात बसून ठेवलं. शेवटी डाके निघून आले. गजानन कीर्तिकरांना संपवलं.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर गजानन कीर्तिकर भेटायला गेले. अडीच तास बाजूला बसवलं पण उद्धव ठाकरे गजाभाऊंशी एक शब्द बोलले नाही. त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. अजितदादा हसायला लागले. शेवटी गजाभाऊ निघून आले. माझी अवस्था काय केली हे महाराष्ट्राने पाहिलं. जे मनोहर जोशींचं झालं, तेच माझं करण्याचा प्रयत्न केला. दिवाकर रावतेंचं मंत्रिपद काढलं, आमदारकी काढली. माझंही मंत्रिपद काढलं, आमदारकी काढली. एका नेत्याला उद्धव ठाकरेंनी शिल्लक ठेवलं नाही. ज्याने शिवसेना मोठी केली, त्या सर्वांना संपवलं. हे महाराष्ट्राने पाहिलं, अशी खदखदही त्यांनी व्यक्त केली.