राज्याच्या राजकीय वर्तूळात सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीची चर्चा आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटातील काही नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. एका कार्यक्रमाबत बोलताना, ‘मी पात्र असताना 2019च्या मंत्रिमंडळात मला घेतलं गेलं नाही’ असं जाधव यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भास्कर जाधवांनी व्यक्त केली नाराजी
चिपळूणमधील एका कार्यक्रमात बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, ‘2019 च्या मंत्रिमंडळात मला घ्यायला हवं होतं, सर्वात जास्त जुना, सर्वाधिक वेळा निवडून येणारा मीच होतो आणि तो माझा अधिकार होता, पण मला घेतलं नाही मात्र त्यानंतर मी कधीही नाराजी व्यक्त केली नाही.’
पक्षात असताना गद्दारी करणारे महागद्दार – जाधव
पुढे बोलताना भास्कर जाधव यांनी पक्षात राहुन पक्षाविरोधी काम करणाऱ्या नेत्यांनाही सुनावलं आहे. जाधव यांनी म्हटलं की,’माझ्या पुढ्यातील ताट अनेकांनी ओढण्याचा प्रयत्न केला, पण मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाच्या पुड्यातील ताठ ओढलं नाही. पक्षात राहून पक्षाच्या विरोधात जे गद्दारी करतात ते महागद्दार आहेत.
भास्कर जाधवांची भाजपवरही टीका
भास्कर जाधवांनी यावेळी बोलताना भाजपवरही सडकून टीका केली आहे. जाधव यांनी म्हटले की, ‘भाजपला पाकिस्तानबद्दल जेवढं प्रेम आहे तेवढं या देशामध्ये कुणालाच नाही. कर्नल सोफिया कुरेशी यांना भाजपचा नेता आतंकवाद्यांची बहीण म्हणतो. किती उलट्या काळजाचे लोक आहेत हे, तिथंही हिंदू मुस्लिम करतात. ते विंग कमांडर व्योमिका सिंगला असं का नाही बोलत? असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला आहे.
भाजपला पाकिस्तानबद्दल प्रेम – जाधव
भास्कर जाधव यांनी भारत-पाकिस्तान तणावावरही भाष्य केलं आहे. जाधव म्हणाले की, ‘युद्धाबद्दलही बोललं पाहिजे. पण कुठलं युद्ध आणि कुठलं काय, काय सांगायचं त्याबद्दल, नाहीतर माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतील. यांना कोणी काही विचारलं की हे म्हणतात तुम्ही पाकिस्तानचे समर्थक. भाजपला पाकिस्तानबद्दल जेवढं प्रेम आहे तेवढं कुणालाच नाही. सकाळ-संध्याकाळ भजपवाले पाकिस्तानचं नाव घेत असतात तेवढं कोणी घेत नाही. त्यामुळे यांच्यापासून देशाला वाचवायला हवं’.