मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे भाष्य, नेमकं काय म्हणाले? वाचा…

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात युती होणार असल्याची चर्चा आहे. यावर राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. दोन्ही पक्षांकडून या युतीचे संकेत मिळाले आहेत. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारला. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मी आत्ताच यावर प्रतिक्रिया देणार नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवर मी योग्य वेळी बोलेल. कारण या दोघांच्या युतीशी माझा काहीही संबंध नाही. त्यामुळे माझ्या राजकीय अनुभवावरुन मी योग्य वेळी बोलेल.’

उद्धव ठाकरेंच सूचक विधान

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बघु, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, ते होईल’. मनसे-ठाकरे गटाच्या युतीवर तुम्ही काय संदेश द्याल? यावर प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “संदेश कशाला? मी बातमीच देईन तुम्हाला.शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही सैनिक आमच्या संपर्कात आहेत. दोन्ही सैनिकांमध्ये संभ्रम नाही. आम्ही जी बातमी द्यायची ती देऊ”.

संजय राऊतांकडूनही युतीचे संकेत

मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीबाबत बोलताना खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, ‘राज ठाकरे यांचे घर आमच्यासाठी दुसरे घर आहे, आम्ही युतीबाबत सकारात्मक आहोत, म्हणून खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलं आहे. आम्ही सकारात्मक आहोत. राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत.’ अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)